अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

  • बिहारमध्ये पुन्हा जंगलराज !

  • भावाच्या हत्येत मुख्य साक्षीदार असल्याने आरोपींनी हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप

हत्या करण्यात आलेले पत्रकार विमल यादव

अररिया (बिहार) – येथील राणीगंज भागात दैनिक ‘अखबार’चे पत्रकार विमल यादव (वय ३६ वर्षे) यांची त्यांच्या घरात घुसून अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. वर्ष २०१९ मध्ये विमल यादव यांचे लहान भाऊ गब्बू यादव यांची हत्या करण्यात आली होती. ते बेलसरा पंचायतीचे सरपंच होते. या हत्येच्या खटल्यात विमल यादव मुख्य साक्षीदार होते. या खटल्याची सुनावणी जलद गती न्यायालयात चालू होती आणि त्यात विमल यादव यांची साक्ष नोंदवण्यात येणार होती. यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस विमल यादव यांच्या हत्येचे अन्वेषण करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यादव यांच्या हत्येविषयी दुःख व्यक्त केले आहे.

१. विमल यादव यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, गब्बू यादव यांच्या हत्येच्या प्रकरणी सुपौल येथील कारागृहात अटकेत असणार्‍या रूपेश यानेच विमल यांच्या हत्येचा कट रचला आणि त्याने कारागृहातूनच हत्येची सुपारी दिली. रूपेशला भीती होती की, विमल यांच्या साक्षीनंतर त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यामुळेच त्याने विमल यांची हत्या घडवून आणली.

२. कुटुंबियांनी सांगितले की, विमल यादव यांना नेहमीच त्यांच्या हत्येची भीती वाटत होती. त्यामुळेच त्यांनी पिस्तूल बाळगण्यासाठी परवाना मिळण्यासाठी अनेकदा अर्ज केला होता; मात्र त्यांना परवाना मिळाला नव्हता. (ही आहे बिहारमधील प्रशासनाची तत्परता ! स्वतः नागरिकांचे रक्षण करायचे नाही आणि त्यांनाही तसे करू द्यायचे नाही, असेच बिहार प्रशासनाने ठरवले आहे, हेच यातून लक्षात येते ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?