सिंधुदुर्ग : देशाच्या फाळणीच्या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ दोडामार्ग येथे भाजपचा मूक मोर्चा

दोडामार्ग – १४ ऑगस्ट या देशाच्या फाळणीच्या दिवशी सहस्रो नागरिक मृत्यूमुखी पडले. देशाच्या फाळणीच्या या वेदनादायी दिवसाच्या निषेधार्थ भाजपने दोडामार्ग शहरात मूक मोर्चा काढला.

दोडामार्ग शहरातून निघालेला भाजपचा मूक मोर्चा

शहरातील श्री गणेश मंदिर ते दोडामार्ग बाजारपेठेपर्यंत निघालेल्या या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे भाजपचे माजी उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, कसई-दोडामार्ग नगरपंचायीचे नगराध्यक्ष संतोष नानचे आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिरंगा झेंडा हातात घेऊन सहभागी झाले होते.

तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तिरंग्याची विद्युत रोषणाई

दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी धरणाच्या दरवाज्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

भारत सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. १२ मार्च २०२२ पासून प्रारंभ झालेला हा महोत्सव १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जात आहे. भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेश येथे गावोगावी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला जात आहे.

(सौजन्य : News18 Lokmat)

या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्प (धरण) विभागाने धरणाच्या ४ दरवाजांपैकी ३ दरवाजांवर ही विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे रात्रीचे दृश्य मनमोहक दिसते.