ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा, ते शिवमंदिर आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा घणाघात !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिल्यानंतर गेले ४ दिवस ज्ञानवापीच्या परिसराचे भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. या प्रकरणी एका पत्रकाराने बाबा बागेश्‍वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांना प्रश्‍न केला असता ते म्हणाले की, ज्ञानवापीला मशीद म्हणणे बंद करा. ते शिवमंदिर आहे.

सौजन्य न्यूज स्टेट 

याआधी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही स्पष्ट केले होते की, ज्ञानवापी ही मशीद नाही. मशिदीच्या आत त्रिशूळ कसा असू शकतो ? आम्ही तर तो ठेवलेला नाही. ज्ञानवापीतील देवाच्या मूर्ती आणि हिंदु धर्माची प्रतिके असलेल्या भिंती ओरडून काय म्हणत आहेत ?

दुसरीकडे ७ ऑगस्ट या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून ज्ञानवापीच्या चौथ्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना हिंदु पक्षाचे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी म्हणाले की, सर्वेक्षणामध्ये आज आधुनिक यंत्रांचा उपयोग केला गेला. सर्वेक्षण व्यवस्थित चालू आहे. हिंदु पक्षकार महिला म्हणाल्या की, सर्वेक्षणाने आम्ही संतुष्ट आहोत. आम्हाला न्यायालयावर संपूर्ण विश्‍वास आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणावरून आम्ही आनंदी आहोत.

सर्व सनातनी हिंदू जागृत व्हा ! – पंडित धीरेंद्र शास्त्री

नूंह येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रश्‍नावर पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, नूंहमध्ये जे घडले, ते राक्षसी कृत्य आहे. हे देशाचे दुर्भाग्य आहे की, सनातन हिंदु धर्मीय यांना हे सर्व पहावे लागत आहे. सर्व सनातनी हिंदूंनी जागृत व्हावे.