‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !

कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचे वारसदार, पदाधिकारी आणि देणगीदार यांसह ८९ जणांचा सत्कार !

डावीकडून (बोलतांना) श्री. सुनील सांगेलकर, बृहन्मुंबई महानगरपालिका सहआयुक्त (सुधार)
श्री. संजोग कबरे, डॉ. (सौ.) स्वाती गडकर, श्रीमती स्मिता नवलकर, सौ. तेजश्री आडिगे, श्री. न्हानु नाईक

मुंबई – कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी वर्ष १९२६ मध्ये स्थापन केलेल्या ‘नाईक मराठा मंडळा’ला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मंडळासाठी कार्य केलेले पदाधिकारी, देणगीदार आणि गुरुवर्य केळुस्कर यांचे वारसदार अशा एकूण ८९ जणांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेले आपत्काळाशी संबंधित ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. अंधेरी (पूर्व) येथील सिम्फनी बँक्वेट्स, तिसरा मजला येथील सभागृहात २१ जून या दिवशी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ‘नाईक मराठा समाजा’चे ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदिती नांदोस्कर आणि श्री. सुनील सांगेलकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेशवंदना यांनी कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

कार्यक्रमाला उपस्थित ज्ञातीबांधव

या वेळी व्यासपिठावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त (सुधार) श्री. संजोग कबरे, नाईक मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. (सौ.) स्वाती गडकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्री. प्रदीप कबरे, सनातन संस्थेच्या श्रीमती स्मिता नवलकर, तसेच श्री. उत्तम तोरसकर, कार्याध्यक्ष श्री. सुनील सांगेलकर, सहकार्यवाह श्री. न्हानु नाईक, प्रसिद्ध नृत्यांगना सौ. तेजश्री आडिगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्री. सुनील सांगेलकर यांनी केले. या वेळी त्यांनी मंडळाचा स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास मांडला. मंडळाकडून चालू असलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘दत्तक विद्यार्थी योजने’अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ पुरवण्याचा मंडळाचा मानस आहे.’’

या वेळी सनातन संस्थेच्या श्रीमती स्मिता नवलकर म्हणाल्या, ‘‘कार्यक्रम उत्तम झाला. समाजकार्य करण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे. आपल्या ज्ञातीबांधवांसह आपला धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करणे आवश्यक आहे; कारण राष्ट्र सुरक्षित, तर आपण सुरक्षित ! यासाठी युवकांचे संघटन अवश्यक आहे.’’