१५ ऑगस्टला देशात घातपात घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने उधळला !

देशातील महत्त्वाच्या शहरांना सतर्कतेची चेतावणी

पुणे – अल् सुफा आणि इसिस या आतंकवादी संघटनांशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. या आतंकवाद्यांची महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने कसून चौकशी केली. त्या वेळी १५ ऑगस्ट या दिवशी देशात घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. भारतासह इस्रायलही या आतंकवाद्यांचे लक्ष्य असल्याची माहिती मिळाली आहे. महंमद युनूस साकी, महंमद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बडोदावाला आणि शाहनवाज आलम अशी आतंकवाद्यांची नावे आहेत. हे सर्व जण मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन १५ ऑगस्टला आतंकवादी घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, देहलीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे.

नुकत्याच अटक करण्यात आलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला याने मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे भाड्याने घर घेतले होते का ?, याचे अन्वेषण महाराष्ट्र आतंकविरोधी पथक करत आहे.

बंदी घालूनही संघटनेच्या आतंकवादी कारवाया चालू !

अल्-सुफा ही आतंकवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी ते इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. या संघटनेचे मुख्य लक्ष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आणि भाजपचे नेते असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. एक दशकापूर्वी अल् सुफावर सरकारने बंदी घातली होती.

कोंढव्यातील आतंकवादी गटा (मॉड्युल्स) एकमेकांच्या संपर्कात !

एन्.आय.ए. आणि ए.टी.एस्. या २ वेगवेगळ्या अन्वेषण यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली कोंढवा भागातील आतंकवाद्यांचे गट एकमेकांच्या संपर्कात होते आणि एकमेकांना साहाय्यही करत होते, हे स्पष्ट झाले आहे. कारण एन्.आय.ए.ने अटक केलेला झुल्फीकार अली बडोदावाला हा आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले महंमद युसूफ खान आणि महंमद युनूस साकी यांना पैसै पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

आतंकवादी कारवायांसाठी कोंढवा केंद्रस्थानी !

पुण्याच्या कोंढवा भागातील ज्योती चौकालगत असलेल्या एका इमारतीत अदनान अली सरकार रहात होता. तेथून जवळच त्याच्या भावाचा मेहुणा झुबेर नूर शेख याला, तर तेथून काही अंतर असलेल्या चेतनानगर येथून महंमद युनूस साकी आणि महंमद युसूफ खान यांना अटक करण्यात आली. तेथून पुढे असलेल्या ‘अशोका म्यूस सोसायटी’तून मन्सूर पिरबॉयसह अनेक आतंकवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याच परिसरातून काही अंतर पुढे पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या बंदी घातलेल्या संघटनेचे कार्यालय होते. ‘आतंकवादी कारवायांमध्येे गुंतलेल्या या आतंकवाद्यांचे परस्परांशी संबंध होते का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

संपादकीय भूमिका

राष्ट्रीय सणांच्या वेळी आतंकवादाची टांगती तलवार प्रतीवर्षी भारतियांवर असतेच ! भारत आतंकवादमुक्त करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !