चांदेराई आणि हरचिरी येथील पूर ३६ तासांनी ओसरला : जनजीवन पूर्वपदावर

रत्नागिरी – दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागांतील पुराचे पाणी ओसरल्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर चालू झाले आहे. चांदेराई आणि हरचेरी बाजारपेठांतील पाणी ३६ तासानंतर ओसरले.

२६ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे बाजारपेठेतील लहान-मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली आहेत. चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे, तर हरचिरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर चिखल साचला आहे. चांदेराई पुलावरील कठडा तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला. २८ जुलैला पहाटे ६ वाजता या बाजारपठांतील पाणी ओसरले आहे.

या परिसरातील सोमेश्वर आणि काजरघाटी येथील पूर्ण शेती पाण्याखाली होती. या गावातील लावणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यानंतर गेले दोन दिवस येथील भातशेती पाण्याखाली असल्याने त्यावर काही ठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे येथील शेतीचे काही प्रमाणात हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.