आझमगड (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक

अटक करण्यात आलेल्या ख्रिस्ती महिला

आझमगड (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील सिकंदर पट्टी गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ५ ख्रिस्ती महिलांना अटक करण्यात आली. प्रार्थनासभांच्या नावाखाली लोकांना ख्रिस्ती बनवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर पट्टी गावातील ब्रिजेश पांडे यांनी त्यांच्या गावात चालू असलेल्या धर्मांतराची माहिती पोलिसांना दिली. ‘विजय बिंद्रा नावाच्या व्यक्तीच्या शेतात बांधलेल्या घरात काही लोक जमले आहेत आणि हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे संगीत वाजवत आहेत’, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.

२. या तक्रारीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोचले. झडतीच्या वेळी पोलिसांना काही आक्षेपार्ह साहित्य, छायाचित्रे आणि वाद्ये सापडली. धमकावणे आणि आमीष दाखवून धर्मांतरासाठी प्रवत्त करणे या आरोपांखाली पोलिसांनी ५ महिलांना अटक केली. आरोपी महिला सुलतानपूर आणि जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

ख्रिस्ती पाद्य्राने आक्रमण केल्याचा बजरंग दलाच्या पदाधिकार्‍याचा आरोप

अन्य एका घटनेत बहराइच जिल्ह्यात एका पाद्य्राने त्याच्या काही साथीदारांसह बजरंग दलाचे अवध प्रांत विभागाचे संयोजक दीपांशु श्रीवास्तव यांच्यावर आक्रमण केल्याचा आरोप आहे. श्रीवास्तव यांनी सांगितले, ‘काही दिवसांपूर्वी मी पाद्री अनिल याच्या विरोधात हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्याच्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. यामुळे पाद्री अनिल याने मला बघून घेण्याची धमकी दिली होती. (प्रेम आणि शांती यांचा संदेश देणार्‍या पाद्य्राचे खरे स्वरूप ! – संपादक) ११ जुलै २०२३ या दिवशी मी घरी परतत असतांना वाटेत २ दुचाकीवरून आलेल्या ४ जणांनी माझ्यावर आक्रमण केले.’ या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये हिंदुत्वनिष्ठ भाजपचे सरकार असतांना ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे हिंदूंचे धर्मांतर करण्याचे दुःसाहस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !