हिंदूंनी धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करावे ! – राहुल दिवान, अध्यक्ष, शरयू ट्रस्ट, नवी देहली

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चतुर्थ दिवस – मान्यवरांचे विचार

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने भारताला वर्ष २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यासमवेत आता ‘ब्लॅक मॅजिक जिहाद’ही करण्यात येत आहे. ‘हलाल’ची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेएवढी झाली आहे. मुसलमानांची वाढती संख्या आणि हिंदूंची घटती संख्या हे भारताला पुन्हा विभाजनाकडे नेत आहेत. यातून भविष्यात गृहयुद्ध निश्चित आहे.

श्री. राहुल दिवान

या परिस्थितीतही हिंदू आक्रमणाची नाही, तर संरक्षणनीती अवलंबत आहेत. यापुढे हिंदूंनी विस्तारवादी भूमिका स्वीकारायला हवी. यापूर्वीही भारत अखंड होता, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. वर्ष २०३० पर्यंत हिंदूंनी १० कोटी धर्मांतरितांना त्यांच्या इच्छेने पुन्हा स्वधर्मात आणण्याचे ध्येय ठेवायला हवे. यासाठी सर्व मंदिरांमध्ये घरवापसीचे फलक लावायला हवेत. धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी मंदिरांमध्ये विधी करायला हवेत. ख्रिस्ती मिशनरी हिदूंचे धर्मांतर करत असतील, तर हिंदूंनीही धर्मांतरित हिंदूंना स्वधर्मात आणण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात करायला हवे, असे आवाहन नवी देहली येथील ‘शरयू ट्रस्ट’चे अध्यक्ष राहुल दिवान यांनी केले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

या वेळी व्यासपिठावर छत्तीसगड येथील ‘हिंदु जागरण मंचच्या प्रांत सहसंयोजक सौ. ज्योती शर्मा, ‘अरुणाचल प्रदेश बांबू संशोधन आणि विकास एजन्सी’चे उपाध्यक्ष श्री. कुरु ताई, हिंदु जनजागृती समितीच्या सातारा येथील समन्वयक सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.