विशाळगडावरील दर्ग्यात पशूबळी बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !

मुंबई – कोल्हापूरमधील विशाळगड परिसरातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पशूबळीच्या प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. पशूबळीच्या बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी दर्ग्याच्या विश्‍वस्तांनी याचिका प्रविष्ट केली होती. यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला या संदर्भात पाच जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भातील याचिकेवर समज देतांना न्यायालय म्हणाले, ‘‘याला धार्मिक रंग देऊ नका. विशाळगड परिसरात प्राण्यांच्या अशा नियमबाह्य हत्येला अनुमती देता येणार नाही. या सणाच्या आयोजकांनी सार्वजनिक स्वच्छतेचेही भान राखायला हवे.’’

(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्ववादी संघटना जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करत आहेत !’ – दर्ग्याच्या विश्‍वस्तांचा फुकाचा आरोप !

प्रशासनाने घातलेली ही बंदी निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. मुळात ही धार्मिक प्रथा हिंदु-मुसलमान ऐक्यात पिढ्यानुपिढ्या येथे चालू असतांना आता अचानक विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या कट्टर हिंदुत्वनिष्ठ संघटना जाणीवपूर्वक वातावरण कलुषित करत आहेत. त्यामुळेच प्रशासनाने ही बंदी घातली आहे. असा थेट आरोप करत हजरत पीर मलिक रेहान मिरा साहेब दर्गा विश्‍वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका केली आहे.

‘परमेश्‍वरासाठी बळी देण्याच्या नावाखाली पशूपक्षांच्या बेकायदा हत्येवर यंदा बंदी असेल’, असे पुरातत्व विभागाच्या उपसंचालकांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे, तसेच स्थानिक प्रशासनानानेही या बंदीचे आदेश काढले आहेत. (दर्ग्यात परमेश्‍वरासाठी नाही, तर ज्यांचा दर्गा आहे, त्यांच्यासाठी बळी दिला जात असू शकतो. पुरातत्व विभागाने ‘परमेश्‍वर’ हा शब्दप्रयोग करून दिशाभूल का केली ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • मुळात असे अनधिकृत दर्गे ऐतिहासिक गडांवरच उभेच कसे रहातात ? आणि वर्षानुवर्षे शासकीय संरक्षित जागेवर स्वतःचे धार्मिक कार्यक्रम कसे राबवतात ?, याची खरेतर प्रथम चौकशी व्हायला हवी !
  • गड हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोगलांवरील विजयाचे साक्षीदार आहेत; किंबहुना त्यांच्या साहाय्यानेच त्यांनी ५ पातशाह्यांवर विजय मिळवला. त्यामुळे गडांवर मोगल आक्रमकांचे दर्गे असणे हिंदूंना लज्जास्पद आहे !