आसाम-अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर गोळीबार : २ ठार, ३ बेपत्ता

गौहत्ती (आसाम) – आसाममधील धेमाजी जिल्ह्यातील अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ नुकत्याच झालेल्या गोळीबारात २ जण ठार, तर ३ जण बेपत्ता झाले. पोलीस अधीक्षक रंजन भुईया यांनी सांगितले की, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्थानिक लोकांनी आंतरराज्य सीमेवर वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले होते. सकाळी ७ गावकरी कार्यक्रमाच्या सिद्धतेसाठी घटनास्थळी गेले होते. तेथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांतील एकाचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन जणांना गोळ्या लागल्याने ते घायाळ झाले. घायाळ व्यक्तींना धेमाजी सदर रुग्णालयात भरती करण्यात आले असता तेथे आणखी एकाचा मृत्यू झाला. अन्य तिघे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, असे भुईया यांनी सांगितले.

या घटनेविषयी बोलतांना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘‘दोन्ही राज्यांमध्ये अद्याप सीमा निश्‍चित नाही. आमच्या शेजारची राज्ये आमच्यावर आक्रमण करत नाहीत. काही लोक लालसेपोटी असे करतात. पोलीस त्याचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करतील.’’