अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

अहिल्यानगर (नगर) येथे पत्रकार परिषद !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

मंदिराच्या बाहेर लावण्यात आलेला वस्त्रसंहितेचा फलक

अहिल्यानगर (नगर) – मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर आणि अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त उपरोक्त ठराव संमत करण्यात आला होता, तसेच अहिल्यानगर (पूर्वीचा अहमदनगर जिल्हा) येथे ७ मे २०२३ या दिवशी झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये याविषयावर चर्चा करून ठराव संमत झाला होता. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याविषयी निश्चय झाला. त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपति मंदिर येथे ३ जून या दिवशी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये श्री अंबिकादेवी मंदिर (बुर्‍हाणनगर), श्री शनि-मारुति मंदिर (माळीवाडा), श्री शनि-मारुति मंदिर (दिल्ली गेट), श्री शनि-मारुति मंदिर (झेंडीगेट), श्री तुळजाभवानी मंदिर (सबजेल चौक), श्री गणेश राधाकृष्ण मंदिर (मार्केट यार्ड), श्रीराम मंदिर (पवननगर सावेडी), श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (वाणीनगर) या मंदिरांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिरांमध्ये येत्या २ मासांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे घोषित करण्यात आले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. ‘ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत वस्त्रसंहिता लागू केली, तसेच देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच ठिकाणी वस्त्रसंहिता लागू आहे, त्याचप्रमाणे मंदिरांमध्ये सुद्धा वस्त्रसंहिता असावी’, असे मत या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले…

१. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, अंमळनेर येथील श्री देव मंगळग्रह मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे.

२. गोव्यातील बहुतांश मंदिरांसह ‘बेसिलिका ऑफ बॉर्न जीझस’ आणि ‘सी कॅथेड्रल’ या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स-पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे.

३. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही.

४. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत ?’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे.

५. आज मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी, तसेच व्यक्तीस्वातंत्र्यवाले लगेच याला विरोध करतात; मात्र पांढरा पायघोळ झगा घालणारे ख्रिस्ती पाद्री, तोकडा पायजमा घालणारे मुल्ला-मौलवी वा काळा बुरखा घालणार्‍या मुसलमान महिला यांच्या वस्त्रांविषयी ते आक्षेप घेत नाहीत.

पत्रकार परिषदेतील मान्यवरांचे मनोगत

१. माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर म्हणाले, ‘‘मंदिर महासंघाने केलेले आवाहन हे चांगले असून याचा प्रारंभ विशाल गणपतिपासूनच आम्ही केला आहे. सर्वांनी सहकार्य करावे आणि वस्त्रसंहितेचे पालन करून सहकार्य करावे.’’

२. माळीवाडा पंच मंडळ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे म्हणाले, ‘‘भारतीय वस्त्रे पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. ‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आम्ही काहीही करू’, असे येथे चालणार नाही. धर्माचरण करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.’’

३. ह.भ.प. प्रभाताई भोंग म्हणाल्या, ‘‘मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. मंदिरांची संस्कृती, पावित्र्य आणि मांगल्य टिकून रहाण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मंदिरात प्रवेश करतांना अंगप्रदर्शन करणारे, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून येऊ नये’, अशी आमची भूमिका असून यासाठी आम्ही वस्त्रसंहिता लागू करत आहोत. यासाठी श्रीकृष्ण-राधा मंदिर, सारसनगर याठिकाणीही तसा फलक लावणार आहोत.’’

४. बुर्‍हाणनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणे’, असे नसून मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी ती आवश्यक आहे. भारतीय वस्त्रे परिधान केल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार होण्यासह तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल. पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्रनिर्मिती करणार्‍या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, अशी महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका आहे.’’

५. मंदिर रक्षा समितीचे श्री. बापू ठाणगे म्हणाले, ‘‘मंदिर रक्षा समितीच्या माध्यमातून वस्त्रसंहिता हे अभियान राबवले जात आहे. यास सर्वच ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्वच मंदिरांचे विश्वस्त आपापल्या परीने वस्त्रसंहितेचे पालन करण्यास आणि मंदिरासमोर सूचनांचे फलक लावण्यास सिद्ध आहेत.’’