पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध !

पुणे – पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडून बालभारतीची पुस्तके सिद्ध झाली असून लवकरच ही नवी कोरी पुस्तके शाळांमध्ये वितरित होणार आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍या बालभारतीने ही नवी कोरी पुस्तके सिद्ध केली असून पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडे, घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात त्यासाठी पुस्तकांना वह्यांची पाने जोडलेली आहेत. यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२३-२४ पासून इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. ‘माझी नोंद’ या सदराखाली विद्यार्थी शिक्षक शिकवत असतांना किंवा पाठ समजून घेत असतांना या वह्यांच्या जोडलेल्या पानांवर विद्यार्थ्यांना लिहिता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयासाठी वेगळी वही सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. शिक्षक जे शिकवतील त्याच्या नोंदी आता याच पुस्तकाला जोडलेल्या पानांवर करायच्या आहेत.

हे एकात्मिक पाठ्यपुस्तक असून एकाच पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारे सर्व विषय असणार आहेत. सोबतच यामध्ये एका विषयाचे पुस्तक ४ भागांमध्ये विभागले गेले आहे. १५ जूनपासून शाळा चालू होणार असून पहिल्या दिवसापासून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या तरी शाळांमध्ये ही पुस्तके दिली जात असल्याने पुस्तकांवर ‘विनामूल्य वितरणासाठी’ लिहिले असले तरी ‘बुक डेपो’मध्ये जेव्हा ही पुस्तके येतील तेव्हा त्याच्या किमती वाढलेल्या असतील.