राज्यात बेपत्ता मुलींचे स्वतंत्र समितीकडून अन्वेषण होणार !

अकोला – राज्यात प्रतिदिन सरासरी ७० मुली आणि महिला बेपत्ता होत असल्याप्रकरणी आढावा घेण्याच्या दृष्टीने स्वतंत्र समिती सिद्ध करून समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने गृह सचिवांना त्यांच्या कार्यालयात १५ मे या दिवशी उपस्थित रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यात मार्चमध्ये २ सहस्र २०० मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

 बेपत्ता महिलांची संख्या चिंताजनक !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्रात गेल्या ३ मासांमध्ये बेपत्ता होणार्‍या मुली आणि महिला यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने ५ जानेवारी २०२२ या दिवशी पहिले पत्र हे हरवलेले विभाग मुंबई यांना पाठवलेले होते. त्यानंतरचा पत्रव्यवहार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, महिला आणि बालविकास मंत्री, राष्ट्रीय बालविकास आयोग त्याचसमवेत पोलीस महानिरीक्षक अन् पोलीस महासंचालक यांना केला आहे.

आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले !

यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न करत असतांना याविषयी ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग अवेअरनेस प्रोग्राम’ राबवण्यात आले. बेपत्ता मुली, आणि महिला यांना मानवी तस्करीच्या जाळ्यामध्ये ओढणार्‍यांची संख्या मोठी आहे, तसेच महिला आणि मुली यांना वेगवेगळ्या प्रकाराची आमीषे देऊन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.