पू. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) संत होण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

पू. सत्‍यनारायण तिवारी

१. वडील रुग्‍णाईत झाल्‍यावर त्‍यांना केवळ भगवान श्रीकृष्‍ण आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचेच स्‍मरण असणे : ‘बाबा (श्री. सत्‍यनारायण तिवारी) रुग्‍णाईत झाले, तेव्‍हा ते सगळे विसरून गेले होते. मुलगा, मुलगी, घर, ‘स्‍वतः कुठे आहे ?’, हेही सर्व ते विसरून गेले होते. त्‍यांना केवळ भगवान श्रीकृष्‍ण आणि प.पू. भक्‍तराज महाराज हेच आठवत होते. ‘माझे भक्‍तराज महाराज कुठे आहेत ? माझा कृष्‍ण भगवान कुठे आहे ?’, असे ते विचारत होते.

२. रुग्‍णालयात भरती केल्‍यावर वडिलांना जवळपास गुरुदेव दिसू लागणे, तेव्‍हापासून त्‍यांनी गुरुदेवांना ‘परमहंस’, असे संबोधणे आणि गोव्‍यात आल्‍यापासून त्‍यांना ‘परमहंस’ दिसण्‍याचे प्रमाण वाढणे : त्‍यानंतर बाबांची शारीरिक स्‍थिती फारच बिघडल्‍यामुळे त्‍यांना रुग्‍णालयात भरती करावे लागले. तेव्‍हा त्‍यांना त्‍यांच्‍या जवळ परात्‍पर गुरु डॉ. आठवले दिसू लागले. तेव्‍हापासून ते गुरुदेवांना ‘परमहंस’, असे म्‍हणायला लागले. त्‍यांची शारीरिक स्‍थिती खालावलेली असली, तरी त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगती होत होती. त्‍यांना ‘परमहंस’ यांचे दिसणे वाढले. ‘ते येथे गोव्‍यात आल्‍यानंतर त्‍यांना ती जाणीव अधिकच होऊ लागली’, असे आमच्‍या लक्षात आले.

३. संभाजीनगर येथून गोव्‍याला आल्‍यावर स्‍मृती परत येऊ लागणे

सौ. सविता तिवारी

अ. बाबांच्‍या मेंदूमध्‍ये रक्‍ताच्‍या बारीक गुठळ्‍या झाल्‍या होत्‍या. त्‍या विरघळण्‍यासाठी त्‍यांना औषधे दिली होती. त्‍या गुठळ्‍या विरघळल्‍या; पण त्‍यांचा अर्ध्या बाजूचा मेंदू निकामी झाला. त्‍यामुळे त्‍यांना पूर्ण विस्‍मरण झाले होते. त्‍यातच त्‍यांना अर्धांगवायूचे (‘पॅरॅलीसिस’चे) झटके ३ वेळा मध्‍यम प्रमाणात आले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शरिराच्‍या डाव्‍या बाजूमध्‍ये शक्‍ती उरली नाही; परंतु आता गोव्‍याला आल्‍यानंतर जसजशी त्‍यांची साधना वाढत गेली, तसतशी त्‍यांची स्‍मृती पुन्‍हा परत येऊ लागली आहे. आता त्‍यांची स्‍मृती पुष्‍कळच चांगली झाली आहे. ‘या वयात त्‍यांची स्‍मृती पुन्‍हा परत येईल’, असे आम्‍हाला वाटले नव्‍हते.’

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (पू. सत्‍यनारायण तिवारी यांची मुलगी), फोंडा, गोवा.

आ. ‘पूर्वी यजमान मला ओळखतच नव्‍हते. ते सुनेलाही ओळखत नव्‍हते; परंतु नंतर हळूहळू आता ते सर्वांना ओळखायला लागले आहेत. ही सर्व गुरुदेवांचीच कृपा आहे.’

– सौ. सविता सत्‍यनारायण तिवारी (पू. सत्‍यनारायण तिवारी यांच्‍या पत्नी, वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा.

४. घराजवळ असलेल्‍या सनातनच्‍या आश्रमाच्‍या चैतन्‍याच्‍या प्रभावामुळे वडिलांचा रात्री बडबडण्‍याचा त्रास आणि चिडचिड न्‍यून होणे : ‘जून २०२२ मध्‍ये माझे आई-वडील माझ्‍याकडे गोव्‍याला आले. बाबा संभाजीनगर येथे असतांना रात्री पुष्‍कळ बडबडत असत. येथे आल्‍यानंतर दुसर्‍या दिवसापासूनच त्‍यांचे बडबडणे बंद झाले. तेव्‍हा आईलाही पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. हळूहळू त्‍यांच्‍या लक्षात आले, ‘घरापासून रामनाथी आश्रम केवळ ३ – ४ मिनिटांच्‍या अंतरावर आहे. त्‍याच्‍या चैतन्‍याचा हा प्रभाव आहे.’ येथे आल्‍यावर केवळ २ मासांत त्‍यांची चिडचिड पूर्णतः बंद झाली.

५. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची भेट !

सुश्री (कु.) आरती तिवारी

५ अ. वडिलांना ‘त्‍यांचा मृत्‍यू जवळ आला आहे’, असे वाटणे आणि दुसर्‍याच दिवशी योगायोगाने परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची भेट होणे : गुरुदेवांची भेट होण्‍याच्‍या आदल्‍या दिवशी बाबांना ‘त्‍यांचा मृत्‍यू जवळ आला आहे’, असे जाणवले होते. त्‍यांनी आम्‍हाला जवळ बोलवून सांगितले, ‘‘आज माझा शेवटचा दिवस आहे’’; परंतु ही गोष्‍ट आम्‍ही कुणालाच सांगितली नव्‍हती. त्‍याच्‍या दुसर्‍याच दिवशी योगायोगाने आम्‍हाला गुरुदेवांचे दर्शन लाभले.

५ आ. त्‍यांची प.पू. गुरुदेवांशी भेट झाल्‍यापासून त्‍यांच्‍या आनंदाचे प्रमाण वाढले आहे.

१. ते गुरुदेवांना म्‍हणाले होते, ‘‘माझ्‍या मृत्‍यूचे आणित्‍याच्‍या पुढचेही सर्व आपणच पहा.’’ तेव्‍हापासून ते एकदम निश्‍चिंत झाले आहेत.’

२. गुरुदेवांचा सत्‍संग मिळाल्‍यानंतर त्‍यांचा चिडचिडेपणा आणखी न्‍यून झाला.

(क्रमशः)

– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी (२३.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक