(म्हणे) ‘आमचे सरकार आल्यास बजरंग दल आणि ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालू !’ – कर्नाटक काँग्रेस

कर्नाटक काँग्रेसचे संतापजनक आश्‍वासन !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (‘पी.एफ्.आय.’) यांच्यावर बंदी घालू, असे आश्‍वासन काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या माध्यमातून जनतेला दिले आहे.

१. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असतांना सर्व राजकीय पक्ष विविध आश्‍वासने देऊन जनतेला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. काँग्रेसने प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट विनामूल्य वीज देण्यासमवेत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगार पदवीधारकांना प्रत्येक मासाला ३ सहस्र रुपये आणि पदविकाधारकांना २ वर्षांसाठी १ सहस्र ५०० रुपये प्रति मास देण्याची घोषणा केली आहे.

३. दुसरीकडे भाजपने ‘आम्हाला पुन्हा निवडून दिल्यास राज्यात समान नागरी कायद्याची कार्यवाही करू’, असे आश्‍वासन दिले आहे. तसेच दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना ३ विनामूल्य गॅस सिलिंडर प्रदान करण्यात येतील, असेही भाजपचे म्हणणे आहे.

श्रीरामाला कुलुपात बंद केलेल्या काँग्रेसला आता ‘बजरंग बली’ला बंद करायचे आहे ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसचा इतिहास मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा राहिला आहे. ज्या काँग्रेसने श्रीरामाला कुलुपात बंद  केले, तिला आता ‘बजरंग बली’ला (हनुमंताला) बंद करायचे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकात एका सभेला संबोधित करतांना केले. काँग्रेसच्या बजरंग दलावर बंदी घालण्याच्या वक्तव्यावर मोदी यांनी हे विधान केले.

संपादकीय भूमिका

  • ज्या काँग्रेसने ‘सिमी’ या आतंकवादी संघटनेवर बंदी लादली नाही, ती तिचेच नवरूप असलेल्या ‘पी.एफ्.आय.’वर कदापि बंदी लादणार नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळे अशा काँग्रेसला जनता ओळखून आहे !
  • देशप्रेमी बजरंग दल आणि देशद्रोही ‘पी.एफ्.आय.’ यांना एकाच मापात तोलणार्‍या काँग्रेसचा निषेध !