देशात जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला !

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध !

मुंबई – केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

या अहवालाविषयी माहिती देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘वर्ष २०१८-१९ मध्ये ही गणना करण्यात आली होती. ‘जलयुक्त शिवार’, ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’, ‘मागेल त्याला शेततळे’ आदी योजना एकत्रितपणे राबवल्याचे हे यश आहे. अन्य राज्यांत तळी आणि जलसाठे अधिक असली, तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. हे आपल्या सर्वांचे सामूहिक यश आहे. आता ‘जलयुक्त शिवार’ हे अभियानही सर्वांनी पुन्हा असेच यशस्वीपणे राबवावे.’’