भटिंडा येथील सैन्य छावणीतील गोळीबाराच्या प्रकरणी सहकारी सैनिकाला अटक

४ सैनिकांची केली होती हत्या !

भटिंडा (पंजाब) – येथील सैन्य छावणीमध्ये १२ एप्रिल या दिवशी करण्यात आलेल्या गोळीबारात ४ सैनिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोहन देसाई या सैनिकाला अटक केली आहे. मोहन देसाई यानेच त्याच्या सहकारी सैनिकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली; मात्र त्याने घटनेविषयी पोलिसांची दिशाभूल केली होती आणि स्वतःच यातील मुख्य साक्षीदार बनला होता. पोलिसांच्या चौकशीतून त्यानेच सैनिकांची हत्या केल्याचे उघड झाले. हत्येचे कारण वैयक्तिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भटिंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई याने चौकशीत दावा केला की, हे ४ सैनिक त्याचा अपमान आणि शारिरीक छळ करत होते. त्याला तो वैतागला होता. वैयक्तिक वैमनस्यातून त्याने ही हत्या केली.