महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या १ लाखाहून अधिक घटना !- मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

आणखी घटना घडू देणार नसल्याचे आश्वासन

मंगलप्रभात लोढा

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – आपण महिलांच्या सुरक्षेच्या गोष्टी करतो; मात्र राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात ५० सहस्रांहून अधिक उपस्थिती असलेले मोर्चे काढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या १ लाखाहून अधिक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नवीन श्रद्धा वालकरप्रमाणे ३६ तुकडे करण्याचे प्रकार होऊ देणार नाही, हे दायित्व शासनाचे आहे, असे वक्तव्य महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केले.

‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ८ मार्च या दिवशी विधानसभेत घेण्यात आलेल्या चर्चेला उत्तर देतांना मंगलप्रभात लोढा यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘लव्ह जिहादच्या घटनांमुळे समाज व्यथित झाला आहे. आंतरधर्मीय विवाहातून होणार्‍या महिलांवरील अत्याचाराच्या घटना होऊ नयेत, यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीद्वारे कुटुंबाशी संपर्क तुटलेल्या महिलांना कुटुंबाशी संपर्क घालून दिला जाईल.’’