नम्रता, प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे सातारा येथील (कै.) विजय ज्ञानू कणसे !

११.२.२०२३ या दिवशी पहाटे ५.१५ वाजता सातारा येथील विजय ज्ञानू कणसे (वय ५८ वर्षे) यांचे निधन झाले. सातारा जिल्‍ह्यातील साधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

कै. विजय कणसे

१. श्री. मुकुंद म्‍हेत्रे, कोरेगाव, सातारा.

अ. ‘काका कार्यालयीन व्‍यस्‍तता आणि व्‍यावहारिक दायित्‍व सांभाळून रात्री कितीही उशीर झाला, तरी सर्व सेवा हसतमुखाने करत असत.’

२. सौ. मेघा शशिकांत कट्टे, वडूज, सातारा.

२ अ. नम्रता आणि अल्‍प अहं : ‘काका सर्वांशी नम्रतेने बोलत असत. ते उच्‍च पदावर नोकरी करत होते, तरीही त्‍यांचे बोलणे वा वागणे यांतून कधीही अहंभाव जाणवला नाही.’

२ आ. चेहर्‍यावर तेज दिसणे : ‘जानेवारी २०२३ मध्‍ये सद़्‍गुरु स्‍वाती खाडये गोंदवले (जिल्‍हा सातारा) येथे आल्‍या होत्‍या. तेव्‍हा मी काकांना प्रथमच भेटले. त्‍या वेळी त्‍यांच्‍या चेहर्‍यावर पुष्‍कळ तेज दिसत होते.’

३. श्रीमती माया शिंदे, सातारा

३ अ. प्रांजळपणा : ‘काकांकडून काही चुका झाल्‍यास किंवा त्‍यांच्‍या पत्नीने काही चुका लक्षात आणून दिल्‍यास ते त्‍या चुका प्रांजळपणे मान्‍य करत असत.’

३ आ. ‘काकांची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली असावी’, असे मला वाटते.’

४. सौ. रत्ना जाधव, कोरेगाव, सातारा.

४ अ. प्रेमभाव : ‘काका कोरेगाव येथे सत्‍संग घेण्‍यासाठी येत असत. तेव्‍हा आमच्‍या सासूबाईना सनातन संस्‍थेच्‍या सत्‍संगात गेलेले आवडत नव्‍हते. काका प्रत्‍येक वेळी माझ्‍या सासूबाई आणि घरातील व्‍यक्‍ती यांची प्रेमाने विचारपूस करायचे. त्‍यांच्‍या या कृतीमुळे आमच्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींमध्‍ये चांगला पालट झाला आणि त्‍यांचा माझ्‍या साधनेला असलेला विरोध अल्‍प झाला.’

५. सौ. छाया म्‍हेत्रे, कोरेगाव, सातारा.

५ अ. सेवेची तळमळ : ‘गुरुपौर्णिमेची किंवा संगणकीय सेवा ते पुढाकार घेऊन करायचे. त्‍यांना सेवा परिपूर्ण करण्‍याचा ध्‍यास होता.’

६. सौ. मीरा मदन सावंत, कराड, सातारा.

६ अ. जाणवलेला पालट

१. ‘मागील काही दिवसांपासून काकांमध्‍ये व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधनेची तळमळ वाढली होती.

२. २५.१२.२०२२ या दिवशी माझी त्‍यांच्‍याशी भेट झाली होती. तेव्‍हा मला त्‍यांच्‍याकडे पाहून चांगले वाटले.’

७. श्री. सुरेंद्र वनारसे, वाई, सातारा.

७ अ. सेवेची तीव्र तळमळ  

७ अ १. ‘काकांनी उद्योजकांसाठीच्‍या सत्‍संगासाठी वाईमधील उद्योजक, विज्ञापनदाते आणि धर्मप्रेमी यांची नावे अन् संपर्क क्रमांक घेतले आणि त्‍यांना साधनेचे महत्त्व सांगून सत्‍संगाला येण्‍यासाठी उद्युक्‍त केले.

७ अ २. पायांवर फोड येऊन जखमा झाल्‍या असतांनाही काकूंना सेवेत साहाय्‍य करणे : एप्रिल आणि मे २०२२ या दोन मासांमध्‍ये धान्‍य अर्पण मिळवून ते आश्रमात पाठवण्‍याची सेवा चालू होती. हे धान्‍य एका साधिकेच्‍या घरी एकत्र केले होते. त्‍या वेळी धान्‍याचा प्रकार कळण्‍यासाठी त्‍यावर ‘लेबल’ लावण्‍याची सेवा कणसेकाकूंकडेे होती. तेव्‍हा शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रासामुळे काकांचे पाय सुजले होते. त्‍यांच्‍या पायांवर फोड येऊन जखमा झाल्‍या होत्‍या आणि त्‍यातून पू येत होता. तेव्‍हा काकांनी पायांवर कापडी पट्टी बांधून काकूंना साहाय्‍य केले. ते साधारण ४ – ५ घंटे बसून जमेल तेवढी सेवा करत होते.

७ आ. सेवा चांगली झाली की, त्‍याचे श्रेय काका परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना देत असत. ते साधकांचे कौतुकही करत असत.’

८. सौ. शिल्‍पा पवार, सातारा रोड, सातारा.

८ अ. सेवेची तळमळ : ‘काका त्‍यांची सेवा नेहमी समयमर्यादेच्‍या आधीच पूर्ण करत असत. ते कामावरून उशिरा आले असले आणि मी सेवेसाठी भ्रमणभाष केला, तरी ते शांतपणे ‘मी आताच आलो आहे. थोड्या वेळातच सेवा करतो’, असे सांगत असत. ते झोकून देऊन सेवा करत असत.’

९. सौ भक्‍ती डाफळे, सातारा

९ अ. हिंदुत्‍वनिष्‍ठांना जोडणे : ‘काकांनी वडूज (जिल्‍हा सातारा) येथे संपर्क करून अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठांना जोडले होते. त्‍यांनी केलेल्‍या संपर्कांमधून मिळालेले धर्मप्रेमी अल्‍प कालावधीत कृतीशील होत असत. श्री. मनोज खाडये यांचा दौरा असतांना काका आदल्‍या दिवशी वडूजला गेले आणि त्‍यांनी तेथे ७० जिज्ञासूंना संपर्क केले. दुसर्‍या दिवशी मनोजदादांच्‍या बैठकीच्‍या ठिकाणी जाऊन त्‍यांनी बैठकीची सिद्धता केली. त्‍या बैठकीला ३५ हिंदुत्‍वनिष्‍ठ आले होते.’

९ आ. काकांच्‍या मृत्‍यूनंतर जाणवलेली सूत्रे

१. ‘काकांचा चेहरा पिवळा झाला होता आणि तो पुष्‍कळ समाधानी वाटत होता.

२. घरातील वातावरण शांत होते. ‘घरात मृत्‍यू झाला आहे’, असे जराही वाटत नव्‍हते.’

१०. सौ. शिवानी देसाई (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), कराड, सातारा.

१० अ. व्‍यष्‍टी साधनेचे गांभीर्य : ‘माझ्‍याकडे काकांचा व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेण्‍याची सेवा होती. काकांना त्‍यांच्‍या शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रासांसाठी ५ घंटे नामजपादी उपाय सांगितले होते. ते ९ घंटे नोकरी करून ५ घंटे नियमित नामजप करायचे. ते व्‍यष्‍टी साधनेच्‍या अंतर्गत असलेली सूत्रे प्रतिदिन वहीत लिहीत असत.’

११. सौ. सुनंदा जेधे, शाहूपुरी, सातारा

अ. ‘कणसेकाकांनी अंतिम क्षणी पत्नीला सांगितले, ‘‘तू सनातन संस्‍थेला सोडू नकोस. भरपूर सेवा कर.’’

१२. श्री. राहुल भरमगुंडे, सातारा

अ. ‘काकांचा मृतदेह रुग्‍णालयातून घरी आणला. तेव्‍हा ‘ते झोपले आहेत’, असे वाटत होते.’

(लेखातील सूत्रांचा दिनांक : २३.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक