गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (७ मार्च २०२३) या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेला कृतज्ञताभाव पहाणार आहोत.

(४ मार्च या दिवशीचा भाग पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/658864.html

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !

३. कु. शिवानी शिंदे (आताची सौ. शिवानी चेतन देसाई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २६ वर्षे), सातारा

३ अ. कौतुक करून प्रोत्साहन देणे : ‘साधकांनी सेवा चांगली केली किंवा साधकांची प्रगती झाली, तर सद्गुरु स्वातीताईंना पुष्कळ आनंद होतो. सद्गुरु स्वातीताई त्या साधकाचे पुष्कळ कौतुक करतात आणि त्या साधकाने केलेले प्रयत्न अन्य साधकांना सांगून त्यांना प्रोत्साहन देतात.

३ आ. ‘गुरुकार्याची हानी होऊ नये आणि साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ असणे : ‘साधकांची साधना आणि गुरुकार्य यांची हानी होऊ नये’, अशी त्यांची पुष्कळ तळमळ असते. ‘साधकांनी त्यांच्यातील स्वभावदोष दूर करून स्वतःत पालट करावा’, ही सद्गुरु स्वातीताईंची ओढ त्यांच्या शब्दांतून जाणवते.

३ इ. योग्य दृष्टीकोन देणे : मला कधी एखाद्या प्रसंगाचा ताण आला, तर सद्गुरु स्वातीताईंशी बोलल्यावर त्या मला प्रेमाने दिशा देतात. ‘त्या प्रसंगात माझे काय चुकले ?’, हेही त्या मला प्रेमाने सांगून योग्य दृष्टीकोन देतात. त्या मला ताणाच्या स्थितीतून बाहेर येण्यास साहाय्य करतात.

३ ई. सद्गुरु स्वातीताई वेळेचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन समजावून सांगतात, ‘उद्या नाही, नंतर नाही, तर या क्षणापासून साधनेला आरंभ केला पाहिजे.’

४. श्री. रमेश लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, मिरज.

४ अ. ‘सद्गुरु स्वातीताई आश्रमात कधी येणार ?’, याची आश्रमातील साधकांना उत्सुकता असते. त्यांच्या येण्याने साधकांना एक वेगळाच आनंद होऊन त्यांच्यात उत्साह निर्माण होतो.

४ आ. चौफेर लक्ष असणे : त्यांचे आश्रमात चौफेर लक्ष असते. एकदा पाण्याचा माठ अयोग्य जागी ठेवला होता. त्यांनी ती चूक आश्रमातील सर्व साधकांच्या लक्षात आणून दिली.

४ इ. तत्परता : सद्गुरु स्वातीताई प्रत्येक साधकाच्या लघुसंदेशाला तत्परतेने उत्तर देतात किंवा साधकांशी भ्रमणभाष करून बोलतात. त्यामुळे साधकांना त्यांचा मोठा आधार वाटतो. साधकांना स्फूर्ती मिळून त्यांचा सेवेचा उत्साह वाढतो.

४ ई. प्रीती

४ ई १. साधकाच्या पायाचा अस्थीभंग झाला असतांना सद्गुरु स्वातीताईंनी आश्रमात आल्यावर प्रथम त्याला भेटून विचारपूस करून आधार देणे : अपघातामुळे माझ्या पायाचा अस्थीभंग झाला होता. त्या वेळी सद्गुरु स्वातीताई सोलापूर येथून मिरज आश्रमात आल्या होत्या. एवढा लांबचा प्रवास करूनही आल्या आल्या त्या प्रथम मला भेटायला आल्या. त्यांनी माझी विचारपूस केली आणि नंतर त्या त्यांच्या निवासाच्या खोलीत गेल्या. त्यांचे अस्तित्व आणि प्रेमळ बोलणे यांमुळे मला आधार वाटला आणि माझ्या पायाचा त्रासही उणावला ! गुरुमाऊली, किती ही प्रीती !

४ ई २. एखाद्या साधकाची भेट व्हायची राहिली असेल, तर सद्गुरु स्वातीताई आठवणीने त्याला भेटतात.

४ उ. अहंशून्यता : सद्गुरु स्वातीताई सेवेच्या व्यस्ततेतून वेळ काढून ‘स्वयंपाकघरात काय साहाय्य करता येईल ?’, ते पाहून साहाय्यही करतात. एकदा एक साधिका जात्यावर हरभरे भरडून डाळ करत होती. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी तिच्या समवेत खाली बसून जात्यावर हरभरे भरडण्यास तिला साहाय्य केले.

४ ऊ. ‘साधकांची साधना व्हावी’ अशी सद्गुरु स्वातीताईंची असलेली तीव्र तळमळ !

४ ऊ १. नियमितपणे व्यष्टी आढावा घेणे : ‘प्रत्येक साधकाची साधनेत लवकर प्रगती व्हावी’, याची तळमळ आम्हा साधकांपेक्षा सद्गुरु स्वातीताईंनाच अधिक आहे. त्यासाठी त्या गेली २ वर्षे नियमितपणे आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी परिवर्तन सत्संग घेऊन आम्हाला ‘कोणते स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर प्रयत्न करायला हवेत’, हे नेमकेपणाने सांगितल्यामुळे साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून आनंद मिळत आहे.’ साधकांच्या स्वभावदोषांमुळे साधकांचे त्रास आणि आवरण वाढते. साधकांची साधना आणि सेवा नियमित चालू रहावी’, यासाठी त्यांनी प्रतिदिन ‘उपाय सत्संग’ चालू केले. त्यात त्या मंत्रजप, मानस दृष्ट, देवीकवच, प्रार्थना, क्षमायाचना करायला सांगून साधकांकडून भावपूर्ण उपाय करवून घेतात.

४ ऊ २. साधकांना समष्टी सेवेसाठी सिद्ध करणे : ‘गुरुदेवांना अपेक्षित असे गुरुकार्य व्हावे’, यासाठी त्या साधकांकडून अभ्यास करून घेऊन नियोजन करून सूत्रे मांडण्याची संधी देतात. त्यामुळे साधकांमधे पुढाकार घेऊन अभ्यासपूर्ण सूत्रे मांडणे आणि शिकणे हा भाग वाढला आहे. यातून साधकांना घडवण्याची सद्गुरु स्वातीताईंची हातोटी आणि तळमळ लक्षात येते.’

५. सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

५ अ. उत्साही : ‘सद्गुरु स्वातीताई म्हणजे अखंड उत्साह आणि चैतन्य यांचा धबधबा आहे. दिवस असो वा रात्र, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, त्या तेवढ्याच उत्साही असतात. त्यांच्या आवाजात कधीच थकवा जाणवत नाही.

५ आ. तत्त्वनिष्ठ : सद्गुरु स्वातीताई अत्यंत तत्त्वनिष्ठतेने आणि परखडपणे साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुका सांगतात. त्यामुळे साधकांच्या मनात चुकांविषयी खंत निर्माण होते. ‘आपल्याकडून अशी चूक पुन्हा व्हायलाच नको’, असे प्रयत्न करण्याची जिद्द साधकांमध्ये निर्माण होते.

५ इ. ‘तळमळ’ या गुणाचे सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरु स्वाती खाडये ! : ‘ध्येय ठेवून अथक प्रयत्न करणे आणि ध्येयाचा ध्यास घेतल्यास अशक्य ते शक्य होऊ शकते’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वर्ष २०२२ मधील गुढीपाडवा शुभेच्छापत्राची मागणी घेण्यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी साधकांकडून करवून घेतलेले प्रयत्न ! ‘हे चैतन्यरूपी शुभेच्छापत्र आपत्काळापूर्वी प्रत्येक घरात पोचले पाहिजे’, यासाठी त्यांनी साधकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून प्रयत्न करवून घेतले.

‘आम्हा सर्वांची साधना व्हावी, साधनेत प्रगती व्हावी’, यांसाठी अत्यंत तळमळीने आणि तत्त्वनिष्ठतेने आम्हाला घडवणार्‍या, आमच्यासारख्या फुटक्या मडक्यातही सुधारणा करून त्याला लायक बनवणार्‍या आमच्या सद्गुरु स्वातीताईंना अनेक नमस्कार !’

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘प्रीतीस्वरूप सद्गुरु स्वातीताईंच्या श्री चरणी आम्हा सर्व साधकांचा भावपूर्ण नमस्कार ! ‘आपण आमच्यावर करत असलेल्या कृपेला आम्हाला पात्र होता येऊ दे. आपला आशिष आमच्यावर सदैव असू दे. आपण आमच्यावर करत असलेल्या कृपेसाठी आम्हाला सदैव कृतज्ञ रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणगतभावाने प्रार्थना आहे.’ – सर्व साधक

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (४.३.२०२२))

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक