भारत-पाकिस्तान देशांच्या सीमेवर ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार !

पुणे – शत्रूशी लढणार्‍या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भारत आणि पाकिस्तान देशांच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण आणि तगधर टिटवाल खोर्‍यात २ ठिकाणी नियंत्रण रेषेत नजीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन होणार आहे. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड आदी गडांवरील माती आणि पाणी भूमीपूजनासाठी मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने शत्रूंना पळवून लावले. सीमेवरील भारतीय सैनिकांना शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर राहून त्यातून स्फूर्ती मिळावी, यासाठी सीमेवर महाराजांची मूर्ती स्थापणार आहे. काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने ही मूर्ती साकारण्यात येणार असून ‘छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समिती’चे प्रमुख अभयराज शिरोळे आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी उपक्रमाचे नियोजन केले आहे.