हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद  

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

यवतमाळ – ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, त्यांना ‘पद्मविभूषण’ मिळाला आणि ज्यांनी गोळ्या झेलल्यामुळे भाजपचे सरकार आणि श्रीराम मंदिर बनले, त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली आहे, अशी खंत हिंदुत्वनिष्ठ नेते आणि आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगाडिया यांनी ७ फेब्रुवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘‘धर्मासाठी काम करणारी मंडळी ज्या देशात उपेक्षित असतात, त्या देशाचे कधीही कल्याण होत नाही. या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, अयोध्या येथील महंत रामचंद्र परमहंस आणि कोठारी बंधू यांना भारतरत्न देण्यात यावा; कारण मंदिराचे श्रेय या सर्व मंडळींना जाते. या ५ जणांव्यतिरिक्त श्रीराम मंदिराचे श्रेय घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. ज्यांच्या प्रयत्नांमुळे श्रीराम मंदिर बनत आहे, त्यांना ‘भारतरत्न’ देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ऋणमुक्ती मिळवावी.’’

आवश्यकता भासल्यास पाकिस्तानावर क्षेपणास्त्रे सोडा !  

प्रवीण तोगाडिया

प्रवीण तोगाडिया म्हणाले, ‘‘पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पाकिस्तानाचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली यांच्यामध्ये एक करार झाला होता. त्यानुसार ‘पाकमध्ये जर हिंदूंवर अत्याचार झाले, तर भारत पाकिस्तानातील हिंदूंच्या पाठीशी उभा राहील’, असे या करारात नमूद करण्यात आले होते. ‘जर पाकिस्तान ऐकत नसेल, तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी भारतातून पाकिस्तानात जाणार्‍या नदीचे पाणी अडवावे अन् तरीही ते ऐकत नसतील, तर पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे सोडावीत.’’