दावोस (स्‍वित्‍झर्लंड) येथील ‘सामंजस्‍य करारां’मुळे महाराष्‍ट्रात विविध क्षेत्रांत गुंतवणूक !

राज्‍यावर गुंतवणूकदारांचा विश्‍वास ! – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

दावोस – जागतिक आर्थिक परिषदेच्‍या निमित्ताने येथे महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत उद्योगांसमवेत विविध ‘सामंजस्‍य करार’ करण्‍यात आले. मुख्‍यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या हस्‍ते ‘महाराष्‍ट्र पॅव्‍हेलियन’चे उद़्‍घाटन करण्‍यात आले. पहिल्‍याच दिवशी ४५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकींचे सामंजस्‍य करार झाल्‍यामुळे उद्योग आणि गुंतवणूकदार यांचा महाराष्‍ट्रावर विश्‍वास असल्‍याचे सिद्ध झाले, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

या सामंजस्‍य कराराच्‍या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्‍यमंत्र्यांचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एम्.आय.डी.सी.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्‍थित होते.

विविध प्रकल्‍पांसमवेतच्‍या सामंजस्‍य करारांची माहिती

१. संभाजीनगर येथे १२ सहस्र कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘ग्रीनको रिन्‍युअबेल एनर्जी’ प्रकल्‍प उभारण्‍यात येणार असून यामुळे ६ सहस्र ३०० जणांना रोजगार मिळेल.

२. महाराष्‍ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्‍या विकासासाठी ‘बर्कशायर-हॅथवे’ या उद्योगाच्‍या १६ सहस्र कोटी रुपयांच्‍या गुंतवणुकीसाठी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असून यामुळे नागरी विकासाला चालना मिळणार आहे.

३. मुंबई येथे ‘इंडस् कॅपिटल पार्टनर्स’ यांचा १६ सहस्र कोटी रुपयांच्‍या गुंतवणुकीचा प्रकल्‍प येणार असून यामुळे आरोग्‍य, तंत्रज्ञान, संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्‍ये उत्‍कृष्‍ट दर्जाच्‍या सेवा देता येऊ शकतील.