समष्टी नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘३ ते १५.९.२०२२ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला समष्टी नामजप करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्रीमती मनीषा गाडगीळ

१. समष्टी नामजपाला प्रारंभ केल्यावर २ दिवसांनी तोंडात गोड चव निर्माण होणे आणि मन पुष्कळ आनंदी होऊन देहही हलका झाल्याचे जाणवणे

‘समष्टी नामजपाला प्रारंभ केल्यावर २ दिवसांनी तोंडात गोड चव निर्माण झाली. ती दिवसातून ३ – ४ वेळेला मला जाणवत असे. तेव्हा माझा हात दुखत होता; परंतु मला त्याची जाणीवही नसायची. मन पुष्कळ आनंदी असायचे आणि ‘देहही पुष्कळ हलका झाला आहे’, असे मला जाणवत होते.

२. नामजप करतांना हातातील जपमाळ पुष्कळ हलकी झाल्याचे जाणवणे आणि तिचा स्पर्शही मऊ जाणवणे

मी समष्टी नामजप करतांना हाताच्या बोटात जपमाळ (९ मण्यांची माळ, ती माळ बोटांत घालून नामजप करता येतो.) घालून नामजप करत होते. १२.९.२०२२ या दिवशी ती जपमाळ मला पुष्कळ हलकी जाणवली आणि तिचा स्पर्शही मला पुष्कळ मऊ जाणवत होता. ती जपमाळ पहातांना मला त्यावर चकाकी आलेली दिसली. ते पाहून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

३. नामजपातील चैतन्यामुळे जपमाळ हलकी झाल्याचे पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी सांगणे

सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे (वय ७४ वर्षे) यांनी ती जपमाळ पाहिली. त्या म्हणाल्या, ‘‘जपमाळ पुष्कळच हलकी झाली आहे. नामजपात चैतन्य असते ना ! नामजपातील चैतन्यामुळे ती जपमाळ हलकी झाली आहे.’’

४. उपनेत्र ठेवत असलेल्या डबीत पुष्कळ दैवी कण दिसणे

१५.९.२०२२ या दिवशी दुपारी मी माझे उपनेत्र (चष्मा) ठेवण्यासाठी डबी (चष्मा ठेवण्याचे कव्हर) उघडली. त्या वेळी त्या डबीत मला पुष्कळ दैवी कण चमकतांना दिसले. त्यामुळे उपनेत्र आणि ती डबी या वस्तूंप्रतीही पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

५. काही वेळेला नामजप करतांना मी रहात असलेली आश्रमातील खोलीही पुष्कळ मोठी आणि प्रकाशमान असल्याचे मला जाणवते. एक दिवस खोलीतील सहसाधिकाही म्हणाली, ‘‘आज खोली पुष्कळ प्रकाशमान जाणवत आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला या अनुभूती आल्या. त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२२)