हिंदु धर्मावरील आघात थांबत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना कार्यरत रहाणार ! 

हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद

धनंजय देसाई

सोलापूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – हिंदूंना केवळ अनुकूल राजसत्ता मिळाल्यामुळे भारतीय संस्कृतीचे पुनर्वैभव प्राप्त होणार नाही. त्यामुळे ‘सीएए’सारख्या कायद्याला विरोध, हिंदु संतांवरील आक्रमणे, ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात थांबत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना हिंदुत्वासाठी अखंड कार्यरत राहील, असे प्रतिपादन हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांनी केले. येथील दत्तनगर भागात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. धनंजय देसाई पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांचा राजकीय पराभव स्वीकारू शकले नाहीत; म्हणून विनाकारण महापुरुषांविषयी संभ्रम पसरवत आहेत, त्यांचे राजकीय अजेंडे हिंदूंनी राबवू नयेत. भारताची फाळणी झाली तेव्हाच हिंदूंसाठी हिंदुस्थान बनवला गेला; मात्र आज देशातील मुसलमान भारताला ‘दार-उल-इस्लाम’ बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. याविषयी हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.