साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जामनेर आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे प्रवचन !

सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे. त्यामुळे व्यावहारिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन कुलदेवतेचा जास्तीतजास्त नामजप, तर पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी किमान एक घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते जामनेर येथील संत सावता मंदिर आणि चोपडा येथील नवग्रह मंदिर येथे आयोजित प्रवचनाच्या प्रसंगी बोलत होते. या प्रवचनांचा पुष्कळ जिज्ञासूंनी लाभ घेतला. तसेच ‘प्रत्येकी १५ दिवसांनी येथे प्रवचन घेण्यात यावे’, अशी उपस्थितांनी मागणी केली.