नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीला जोर !

  • नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुका

  • पुन्हा राजेशाही स्थापन करण्याची मागणी !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून प्रचार चालू आहे. यात नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आणि देशात पुन्हा एकदा राजेशाही आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने थेट जनतेला ‘नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले आहे. यासह साम्यवादी नेते के.पी. शर्मा ओली यांनीही ‘ते हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी पाठिंबा देऊ शकतात’, असे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष आणि शर्मा ओली यांचा पक्ष सी.पी.एन्.-यू.एम्.एल्. हे एकत्रित निवडणूक लढवत आहेत. नेपाळमध्ये ८१.३ टक्के हिंदु आहेत. वर्ष २००७ पर्यंत नेपाळ हिंदु राष्ट्र होते. त्यानंतर माओवाद्यांनी सत्तेवर आल्यावर नेपाळला धर्मनिरपेक्ष देश घोषित केले.

१. राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र लिंगडेन यांनी सांगितले की, आम्हाला वाटते की, राजेशाहीला देशाचे संरक्षक बनवले जावे. नेपाळला सनातन धर्मावर आधारित आणि अन्य धर्मियांना स्वातंत्र्य असलेले हिंदु राष्ट्र बनवले जावे, तसेच पंतप्रधानांची निवड थेट निवडणुकीद्वारे केली जावी.

२. नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांपासून साम्यवाद्यांचे सरकार असून ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळेच आता तेथील राजकीय पक्ष हिंदु राष्ट्राची मागणी करू लागले आहेत. नेपाळचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री प्रेम अले यांनी यापूर्वीच नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे.

३. गेल्या वर्षी ऑगस्ट मासामध्ये नेपाळच्या सैन्याचे माजी सैन्यदल प्रमुख जनरल रुकमांगुड कटवाल यांनी नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी एक अभियान चालू केले होते. याला त्यांनी ‘हिंदु राष्ट्र स्वाभिमान जागरण अभियान’ असे नाव दिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, हे अभियान धर्माच्या आधारे ओळख आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देईल. माझे लक्ष्य ‘हिंदु ओळख’ पुन्हा स्थापित करण्याचे आहे. यात कट्टरता नाही.

४. नेपाळमधील २० हिंदु धार्मिक संघटनांनी नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एक संयुक्त आघाडी स्थापन केली आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मनिरपेक्ष बनवल्या गेलेल्या नेपाळमध्ये जर निवडणुकांद्वारे पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत असेल, तर भारतालाही हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आता राजकीय पक्षांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे हिंदूंना वाटते !