देशामध्ये द्वेष पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे बौद्ध संघटनांचे राष्ट्रपतींना पत्र !

आपचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ देऊन सहस्रावधी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिल्याचे प्रकरण

नवी देहली – देहलीतील केजरीवाल सरकारमधील तत्कालीन मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या विरोधात बौद्ध संघटनांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. गौतम यांनी ५ ऑक्टोबरला झालेल्या दसर्‍याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. यावरून बौद्ध संघटनांनी यामुळे देशामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत असून या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या अन्य लोकांच्या विरोधातही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण समोर आल्यावर गौतम यांना त्यांच्या मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते. या वेळी ‘मी हिंदु धर्मातील देवता ब्रह्मा, विष्णु, महेश, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना ईश्‍वर मानणार नाही. त्यांची पूजाही करणार नाही. माझा राम आणि कृष्ण यांच्याविषयी कोणताही विश्‍वास नसेल, तसेच मी त्यांना भगवंताचा अवतार मानणार नाही’, अशी शपथ देण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले होते.

बौद्ध संघटनांनी या कार्यक्रमाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. या कार्यक्रमात जे काही झाले, ते बौद्ध धर्मानुसार नाही. भगवान बौद्धांच्या शिकवणीशी याचे काहीही देणे-घेणे नाही, असेही या संघटनांचे म्हणणे आहे. धर्म संस्कृती संगम, महाबोधि सोसायटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल बौद्ध रिसर्च आदी संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रावर हस्ताक्षर आहेत.