भारतातील रोहिंग्या मुसलमानांचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंध ! – केंद्र सरकार

नवी देहली – भारतात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमान घुसखोरांचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंध आहे, असे केंद्र सरकारने देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या घुसखोरांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे देशात सुरक्षेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. म्यानमारमधून बंगालसह भारतातील विविध राज्यांमध्ये रोहिंग्या घुसखोरांचा संघटित ओघ चालू आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. गृहमंत्रालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या म्यानमारस्थित महिला सेनोआरा बेगम आणि तिची ३ अल्पवयीन मुले यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर केंद्र सरकारने ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे. भारतातील नागरिकांच्या मूलभूत मानवी हक्कांवर त्याचा हानीकारक प्रभाव पडत आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.