नवरात्रोत्सवात संशयामुळे पती-पत्नी, तसेच पाल्य यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती !

भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांचा दावा

रजनी पंडित

मुंबई – नवरात्रोत्सवाच्या काळात पती-पत्नी, युवक-युवती एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नियुक्ती करतात. येत्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आतापासून ही कामे आली आहेत, अशी माहिती ‘भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर’ अशी ओळख असलेल्या रजनी पंडित यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

याविषयी अधिक माहिती देतांना रजनी पंडित म्हणाल्या…

१. पती-पत्नी यांना एकमेकांवर संयश वाटत असल्यामुळे, तसेच पालकांना स्वत:च्या पाल्यांविषयी माहिती हवी असल्यामुळे गुप्तहेरांचे साहाय्य घेण्यात येते.
२. नवरात्रोत्सवात रात्री-अपरात्री दांडियाच्या नावाखाली अनेक तरुण-तरुणी घराबाहेर पडतात. अनेक पती-पत्नीही दांडियाच्या नावाखाली रात्रभर बाहेर असतात. त्या वेळी पालक अथवा पती-पत्नी यांच्या मनात संशय आल्यास ते आम्हाला त्यांवर पाळत ठेवण्यास सांगतात.
३. आमचे गुप्तहेर वेशांतर करून दांडियाच्या घोळक्यात सहभागी होतात, तर कधी पाठलाग करून ते कुठल्या हॉटेल अथवा निर्जनस्थळी जातात का ? याची माहिती घेऊन देतात.
४. मुंबईसह सुरत, कर्णावती, येथील अनेक कामे सध्या माझ्याकडे आली आहेत. मुंबईमध्ये अशा कामासाठी ५० ते ६० सहस्र रुपये आकारले जातात.
५. नवरात्रीमध्ये काहीजण ९ दिवस पाळत ठेवायलाही सांगतात. यामध्ये तरुण-तरुणी यांसह विवाहित महिला आणि पुरुष यांचे प्रमाणही मोठे आहे.
६. काही वेळा पालक स्वत:च्या मुलीवर कोणताही अतिप्रसंग अथवा वाईट कृत्य होऊ नये, यासाठीही आमच्याकडे धाव घेतात.

संपादकीय भूमिका

  • समाजाची नीतीमत्ता किती खालच्या थराला गेली आहे, याचेच हे उदाहरण होय ! नीतीमत्ता हरपलेल्या हिंदूंमुळे सार्वजनिक धार्मिक उत्सवांना आलेले विकृत स्वरूप लज्जास्पद ! हिंदूंना साधना आणि धर्मशिक्षण न दिल्याचेच हे फलित !
  • कुटुंबांमध्ये एकमेकांविषयी असलेला विश्‍वास हरवल्याचेच हे लक्षण होय ! साधनेच्या अभावामुळेच समाज नीतीहीन होत आहे, हे जाणा !