नेपाळमध्ये ‘अग्नीपथ’वर परिणाम : गुरखा सैनिकांची भरती थांबवली !

काठमांडू – नेपाळमध्ये भारताच्या नवीन भरती योजना ‘अग्नीपथ’ला धक्का बसला आहे. नेपाळ सरकारने बुटवल येथे होणारी भारतीय सैन्यातील गुरखा सैनिकांची भरती थांबवली आहे. ‘अग्नीपथ’ योजनेवर चालू असलेला वाद सोडवण्यासाठी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण खडका यांनी काठमांडूतील भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांची भेट घेतली.

ब्रिटीश राजवटीपासून भारतीय सैन्य नेपाळमधून ‘गोरखा रेजिमेंट’साठी गुरखा सैनिकांची भरती करत आहे. मोदी शासनाने जूनमध्ये नेपाळ सरकारला ‘अग्नीपथ’ योजनेविषयी त्याचे मत काय, अशी विचारणा केली होती. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप चर्चा चालू आहे. ‘अग्नीपथ’ योजनेविषयी नेपाळ सरकार येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेईल, असे नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी सांगितले. भारताने जूनमध्ये नेपाळ सरकारला कळवले होते की, ते २५ ऑगस्ट या दिवशी बुटवल आणि १ सप्टेंबर या दिवशी धरण येथे गुरखा सैन्याची भरती करू इच्छित आहे.