मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातील जलाभिषेक २ वर्षांनी पूर्ववत् !

मुंबई, १७ जुलै (वार्ता.) – मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ या शिवमंदिरातील जलाभिषेक विधी २ वर्षांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने पूर्ववत् चालू झाला आहे. आमदार लोढा यांनी मंदिराचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून मंदिरातील जलाभिषेक विधी पुन्हा चालू केला आहे.

कोरोनाकाळात महाविकास आघाडी सरकारने मंदिरातील जलाभिषेकावर बंदी घातली होती. ही बंदी काढून जलाभिषेक पूर्ववत् करण्याची मागणी भाविकांनी आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली होती.

कोरोनाच्या नावाखाली धर्माचरणाशी संबंधित कृतींवर बंधने आणणे योग्य नाही ! – आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप

हिंदु समाज सहिष्णू आणि धर्मपरायण आहे. कोरोना महामारीच्या नावाखाली धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात होती; मात्र धर्माचरणाशी संबंधित कृतींवर बंधने आणणे योग्य नाही. वैयक्तिक धर्माचरण करणे हा भारतीय घटनेने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.