‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात देशात तिसर्‍या दिवशीही हिंसक आंदोलन

  • आंदोलकांनी बिहारमध्ये अनेक रेल्वेगाड्या जाळल्या

  • अलीगडमध्ये बसगाड्यांची जाळपोळ

नवी देहली – संरक्षण मंत्रालयाच्या ‘अग्नीपथ’ या सैन्याच्या भरती योजनेच्या विरोधात तिसर्‍या दिवशीही देशात हिंसक आंदोलन करण्यात आले. देशातील उत्तर भारतातील अनेक राज्यांत याचे लोण पसरले, तर दक्षिण भारतातील तेलंगाणा येथेही हिंसाचार करण्यात आला. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातील अलीगड येथे बसगाड्या जाळण्यात आल्या. यांसह हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यांतही हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनामुळे बिहारमधील ५५ पॅसेंजर रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या असून १०० रेल्वेगाड्यांचे मार्ग पालटण्यात आले आहेत.

१. बिहारच्या १३ जिल्ह्यांतून या योजनेचा विरोध होत असून यावरून मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू आहे. समस्तीपूर आणि लखीसराय येथे आंदोलकांनी पॅसेंजर गाड्या पेटवून दिल्या. त्याच वेळी बक्सर आणि नालंदा येथे रेल्वे रुळांवर जाळपोळ करण्यात आली आहे. जाळपोळीनंतर आराहमधील रस्ता बंद झाला. समस्तीपूरमध्ये जम्मू तवी-गुवाहाटी एक्सप्रेस पेटवून देण्यात आली. हाजीपूर-बरौनी रेल्वे सेक्शनच्या मोहिउद्दीननगर स्थानकावरही जाळपोळ करण्यात आली. सकाळी ६ वाजल्यापासून आंदोलक रेल्वे रुळांवर उभे राहिल्याने सर्वत्र गाड्या थांबवण्यात आल्या, तर ठिकाणच्या गाड्या रहित करण्यात आल्या.

२. केवळ ४ वर्षांसाठी भरती करणे म्हणजे रोजगाराच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे संतप्त आंदोलक तरुणांचे म्हणणे आहे. आंदोलन म्हणत होते की, आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांचा मुलगा सैन्यात भरती होतो का ? सैन्यात गरीब शेतकर्‍याचा मुलगाच जातो. सरकार या लोकांवर अन्याय करत आहे. ते सहन करणार नाही. केंद्रातील मोदी सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे.

 (सौजन्य : Aaj Tak) 

बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावर आक्रमण

बिहारच्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या घरावरही आंदोलकांनी आक्रमण केले. या वेळी घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या घरावरही आक्रमण करण्यात आले. या वेळी गोळीबारही करण्यात आला.

सिकंदरबाद (तेलंगाणा) रेल्वे स्थानकावर रेल्वेगाडीची जाळपोळ

तेलंगाणाची राजधानी भाग्यनगर येथील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर तोडफोड करण्यात आली. येथे उभी असलेल्या रेल्वेगाडीच्या दोन डब्यांना आग लावण्यात आली. या वेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक आंदोलनकर्ता ठार झाला.

भरतीची वयोमर्यादा २१ वरून २३ पर्यंत वाढवली !

अग्नीपथ योजनेला होत असलेल्या विरोधामुळे केंद्र सरकारने केवळ यावर्षीसाठी भरतीची वयोमर्यादा २१ वरून २३ पर्यंत वाढवली आहे. गेले २ वर्षे कोरोनामुळे भरती झाली नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

येत्या २ दिवसांत भरतीची अधिसूचना जारी होणार ! – सैन्यदल प्रमुख मनोज पांडे

अग्नीपथ योजनेद्वारे सैनिकांच्या भरतीची प्रक्रिया येत्या २ दिवसांनंतर चालू होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना काढण्यात येणार आहे, अशी माहिती सैन्यदलप्रमुख मनोज पांडे यांनी दिली.

त्यांनी अग्नीपथ योजनेला होणारा विरोध चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ही योजना तरुणांना नीट समजलेली नाही. जर त्यांनी ती नीट समजून घेतली, तर त्यांना यातून मिळणार्‍या लाभाची माहिती होईल आणि ते विरोध करण्यापासून परावृत्त होतील, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

देशाच्या संपत्तीची हानी करणारे तरुण सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार, असे कधीतरी म्हणू शकतो का ? अशा हिंसाचार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात टाकून त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !