इस्लामिक देशांच्या भारतविरोधाला तोंड देण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पणजी येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची पत्रकार परिषद

पणजी, १० जून (वार्ता.) – गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा चालू झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करण्यास प्रारंभ झाला आहे. भाजपच्या प्रवक्त्या असतांना नूपुर शर्मा यांनी इस्लाम संदर्भात केलेल्या विधानावरून जगातील अनेक इस्लामी राष्ट्रे एकत्र येऊन भारताला विरोध करत आहेत. अल् कायदाने तर थेट भारतावर आक्रमण करण्याची धमकी दिली आहे; परंतु शिवलिंगाला ‘फव्वारा’ (कारंजे) संबोधून किंवा ‘हिंदू गुप्तांगाची (शिवलिंगाची) पूजा का करतात ?’ असे उघड हिंदुद्वेषी विधान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांच्या विरुद्ध कुणीही विरोध प्रकट करतांना दिसत नाही. यातूनच ‘जगात एकतरी हिंदूंचे राष्ट्र का आवश्यक आहे ?’ हे लक्षात येते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

यासाठीच यंदा १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गोव्यातील ‘भारतमाता की जय संघटने’चे गोवा राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.

या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रुजवण्यासाठी आणि हिंदु राष्ट्रातील आदर्श राजव्यवहाराविषयी दिशादर्शन करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संसदे’चे आयोजन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून श्री. रमेश शिंदे, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, प्रा. सुभाष वेलिंगकर आणि श्री. चेतन राजहंस

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समस्त गोमंतकियांचा पाठिंबा

प्रा. सुभाष वेलिंगकर

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, हीच गोमंतकियांची भावना ! – प्रा. सुभाष वेलींगकर, भारतमाता की जय संघटना

गोव्यातील हिंदूंमध्ये ‘हिंदु राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे’ ही भावना अधिक प्रबळ होत आहे, असा माझा अनुभव आहे. सार्वजनिकरित्या यादृष्टीने कुणीही बोलण्याचे धाडस करत नसले, तरी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही’, असे हिंदूंना वाटत आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच गोव्यातील हिंदूंना आजपर्यंत भोगावे लागलेले अत्याचार अल्प होऊ शकतील. गोव्यातील हिंदूंना चिंतेत टाकणारे अनेक प्रश्‍न आज ऐरणीवर आहेत. रामनाथी, फोंडा येथे होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात गोव्याला भेडसावत असलेले मंदिरे हडपण्याचा प्रकार, धर्मांतर, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर आदी ज्वलंत समस्यांवर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाला समस्त गोमंतकियांचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन ‘भारतमाता की जय’ संघटनेचे राज्य संघचालक प्रा. सुभाष वेलींगकर यांनी केले.

१. गोव्यातील चर्चसंस्था हडप करू पहात असलेल्या प्राचीन विजयादुर्गादेवी मंदिराच्या भूमीचे उत्खनन करून सत्य समोर आणावे !

पोर्तुगिजांनी भग्न केलेल्या गोव्यातील दोन मंदिरांच्या ठिकाणी गोव्यातील चर्चसंस्था आजतागायत चर्च बांधू शकले नाही. यामधील एक म्हणजे वर्णापुरी (वेर्णा) येथील श्री श्री महालसा नारायणी मंदिर आणि मुरगाव तालुक्यात शंखवाळ (साकवाळ) येथे श्री विजयादुर्गाचे प्राचीन मंदिर. वर्णापुरी येथे आता भव्य श्री महालसा नारायणी मंदिर उभे आहे; मात्र गेल्या १० वर्षांपासून शंखवाळ येथे श्री विजयादुर्गाच्या मंदिराचे भग्न अवशेष कह्यात घेण्याचे चर्चसंस्थेचे कारस्थान चालू आहे. शासनावर दबाव आणून पोर्तुगिजांची मंदिरे हडपण्याची परंपरा आद्यापही चालू ठेवण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. शंखवाळ येथे भग्न अवस्थेतील मंदिराचे अवशेष भूमीत गाडून त्या ठिकाणी अनधिकृतपणे ‘चॅपेल’ (लहान चर्च) बांधले आहे. या वास्तूचे पुरातत्व विभागाने ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ’ असे नामकरण केलेले असूनही या वास्तूचे ‘फ्रंटिस पीस ऑफ सांकवाळ चर्च’ असे अनधिकृतपणे नामकरण करून चर्चसंस्था ही भूमी कह्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे ‘तेथील भूमीचे उत्खनन करून सत्य जनतेसमोर आणावे आणि त्या ठिकाणी श्री विजयादुर्गादेवीचे भव्य मंदिर उभारावे’, अशी गोव्यातील समस्त हिंदूंची मागणी आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करणार असल्याचे आणि विधानसभेच्या आगामी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या या विधानाचे गोव्यातील समस्त हिंदू स्वागत करत आहेत.

२. गोव्यातील पाद्री डॉम्निक याने धर्मांतरित केलेले दीड लाख ‘बिलिव्हर्स’ असणे, ही गोव्यासाठी धोक्याची घंटा !

हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यावर जामिनावर सुटलेला ‘बिलिव्हर्स’च्या शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर (पाद्री) डॉम्निक याच्या कारवायांचे सखोल अन्वेषण करावे. डॉम्निक याच्या पत्नीचीही चौकशी करावी. त्याने गोव्यात दीड लाख हिंदूंचे धर्मांतर करून हिंदु नाव धारण केलेले ‘क्रिप्टो हिंदू’ बनवले आहेत. गोव्यात दीड लाख ‘बिलिव्हर्स’ असणे ही धोक्याची घंटा आहे.

३. गोव्यात ‘पी.एफ्.आय.’वर बंदी आणा आणि श्रीराम सेनेवरील बंदी उठवा !

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पाकिस्तानशी संबंध असलेल्या ‘पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्याची केंद्राकडे शिफारस करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रशासनाच्या निर्णयाची वाट न पहाता राज्यस्तरावरील अधिकाराचा वापर करून या संघटनेवर बंदी घालावी. यासह गेल्या अनेक वर्षांपासून ‘श्रीराम सेने’चे संस्थापक तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी कोणतेही गैरकृत्य केलेले नसतांनाही ते आणि त्यांचे सहकारी यांना गोव्यात असलेली प्रवेशबंदी उठवावी, अशी हिंदूंची मागणी आहे.

४. गोव्यात अनुमाने ४५ सहस्र बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान वास्तव्य करत आहेत. त्यांचा शोध घेऊन गोव्यातून त्यांची हकालपट्टी करावी.

श्री. चेतन राजहंस

गोव्यातील शंखवाळप्रमाणेच देशातील अनेक मंदिरांची स्थिती ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘देशातील अनेक मंदिरांची स्थिती ही गोव्यातील शंखवाळ येथील श्री विजयादुर्गाच्या प्राचीन मंदिराप्रमाणेच आहे. केंद्रात आणि अनेक राज्यांत हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे सरकार आल्यामुळे राममंदिर निर्माण, कलम ३७० हटवणे, तसेच ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कायदे झाले. यामुळे सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे शेष आहे. ओवैसी ‘ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. मिशनर्‍यांकडून बलपूर्वक होणार्‍या धर्मांतरामुळे ‘लावण्या’ हिच्यासारख्या हिंदु मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला ३२ वर्षे होऊनही काश्मिरी हिंदूंच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. आजही हिंदूंचे पलायन चालूच आहे. त्यामुळे हिंदूंनी संविधानिक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक आहे.

श्री. रमेश शिंदे

देश-विदेशांतील १ सहस्राहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रण ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी आणि नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १ सहस्राहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण’, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूंचे संरक्षण’, ‘मंदिर-संस्कृती-इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’ आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून त्याविषयी ठरावही संमत केले जातील.

हिंदु जनजागृती समितीने प्रथम मांडलेल्या हिंदु राष्ट्राची देशभरात चर्चा होत असल्याची पोचपावती !

पत्रकार परिषदेला आलेले पत्रकार श्री. रामनाथ पै प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले, ‘‘पहिल्या हिंदु अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेत ‘हिंदु राष्ट्रा’ची भूमिका मांडली होती. १० वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी काहीच चर्चा नव्हती. मी आज १० व्या अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेला आलो आहे. आज देशभरात ‘हिंदु राष्ट्रा’ची चर्चा चालू आहे.’’

अधिवेशनातील प्रमुख उपस्थिती

अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्‍वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार टी. राजासिंह, ‘पनून काश्मीर’चे श्री. राहूल कौल, अरुणाचल प्रदेश येथील श्री. कुरु थाई, ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, पत्रकार, मंदिर विश्‍वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. यासह ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी संयुक्तानंदजी महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील ५८ हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी पत्राद्वारे पाठिंबा दर्शवला आहे. या हिंदुत्वनिष्ठांनी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेलद्वारेही घ्यावा.


‘दशम अखिल भारतीय हिन्दू राष्ट्र अधिवेशन’ के निमित्त 🎙️ पत्रकार वार्ता


पत्रकार परिषदेतील प्रश्‍नोत्तरे

१. साफा मशीद आदिलशहाच्या काळातील असल्याची केवळ चर्चा ! – पुरातत्त्व खात्याचे माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर

प्रश्‍न : ‘फोंड्यात अनेक मंदिरे आणि मशिदी आहेत. मंदिरांच्या परिसरात तेथे एखादे तळे आहे. मशिदींच्या ठिकाणी तळे नाही; पण केवळ साफा मशिदीच्या परिसरात तळे कसे काय ?’, असा एका पत्रकाराने विचारला.

उत्तर (श्री. चेतन राजहंस) : साफा मशिदीच्या परिसरात ती आदिलशहाच्या काळातील मशीद असल्याचे लिहिलेला फलक आहे. माहिती अधिकारांतर्गत याविषयी कागदपत्रे मागवली असता पुरातत्त्व खात्याने अशी कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे सांगितले. ‘लोकांमध्ये चर्चा असल्याने तसा फलक लावला आहे’, असे पुरातत्व खात्याने सांगितले. हिंदु धर्मात देवतांचे अस्तित्व असल्याचे सांगितले आहे. जलाद्वारे देवतांचे तत्त्व जागृत करण्याची हिंदूंची परंपरा असल्याने मंदिरांच्या परिसरात तळे असते. अरबी राष्ट्रांत वाळवंट असल्याने पाण्याचा प्रश्‍न येत नाही. त्यामुळे साफा मशिदीच्या ठिकाणची माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.’’ ‘साफा मशिदीचा ठिकाणी फलक लावण्यासाठी पी.एफ्.आय.’ने पुरातत्व खात्यापर्यंत खोटी चर्चा पसरवली आहे का ? असाही प्रश्‍न उपस्थित होतो.

२. हिंदूंसह विरोधकांतही ‘हिंदु राष्ट्रा’चीच चर्चा !

प्रश्‍न : भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अंतर्गत येते. अधिवेशनातील हिंदु राष्ट्राची मागणी केंद्र शासनाकडे करता का ?, असा प्रश्‍न पत्रकाराने विचारला.

उत्तर (सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे) : हिंदु जनजागृती समितीने प्रत्येक अधिवेशनानंतर हिंदुत्वनिष्ठांनी संमत केलेले ठराव केंद्रशासनापर्यंत पोचवून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली आहे. आरंभी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले; मात्र आताच्या परिस्थितीत देशभरात अनेक ठिकाणी स्वतःहून हिंदु राष्ट्राची मागणी होत आहे. हिंदू आत्मविश्‍वासाने ‘हिंदु राष्ट्र येणार’, असे म्हणत आहेत, तर त्याला विरोध करणारेही तसेच म्हणत आहेत.

३. पत्रकार परिषदेनंतर काही पत्रकारांनी वक्त्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकाचे निरसन करून घेतले.