महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

गेल्या काही वर्षांपासून भारतभूमीतील संत-महात्मे, सिद्धपुरुष, ज्योतिष्यशास्त्राचे जाणकार, नाडीपट्टीवाचक आणि काही द्रष्टे यांनी ‘वर्ष २०२० ते वर्ष २०२५ हा काळ किती भयावह असणार आहे’, याचे संकेत दिले आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही वेळोवेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनातून याविषयी साधकांना सावध केले आहे. धर्म आणि ईश्वर यांवर श्रद्धा असलेले साधक संतवाणीनुसार कृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. दिव्य पुरुषांनी येणाऱ्या भयावह आपत्काळाविषयी साधकांना सांगितल्यामुळे त्यांची ईश्वराविषयीची भक्ती वाढायला साहाय्य होत आहे आणि साधकांचे रक्षणही होत आहे. वर्ष २०१५ पासून गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने साधकांना सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून ऋषीलोकातील ज्ञान मिळत आहे. सप्तर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीमधून येणारा आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांसाठी सांगितलेली काही सूत्रे पुढे दिली आहेत. – श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (७.५.२०२२)

सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९५ (२०.१२.२०२१) मध्ये सप्तर्षींनी येणाऱ्या आपत्काळाविषयी सांगितलेली सूत्रे

अ. जगात कितीतरी देश स्वतःला शक्तीशाली समजतात; पण येणाऱ्या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक देश नष्ट होतील. येणाऱ्या आपत्काळात डोळ्यांची पापणी लवेपर्यंत लाखो लोक मरतील.

आ. हिंदु राष्ट्र्र येण्यापूर्वी श्रीकृष्ण सर्वत्र युद्ध घडवून आणणार आणि भगवान शिव सर्वत्र व्याधी आणणार आहे. युद्ध आणि व्याधी यांमुळे दुर्जनांचा नाश झाल्यानंतर हिंदु राष्ट्र येईल.

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)

सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९८ (१५.४.२०२२) मध्ये सप्तर्षींनी श्रीलंकेत ओढवलेल्या आपत्काळाविषयी सांगितलेली सूत्रे

श्रीलंकेत महागाईमुले पेट्रोलपंपासमोर लागलेल्या रांगा

अ. ‘सध्या रावणनगरी श्रीलंकेची काय स्थिती झाली आहे ?’, हे तुम्हाला ठाऊकच असेल. त्यांचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही अंधारात आहे.

आ. तिकडे लोकांना जेवण बनवण्यासाठी साहित्यही मिळत नाहीत. गाड्या आहेत; पण इंधन नाही. सुखसोयी देणारी यंत्रे आणि घरे आहेत; पण घंटोन्घंटे वीज नाही. असे दृश्य पुढे सर्वत्र दिसणार आहे.’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)

१. सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९० (२१.१०.२०२१) मध्ये सप्तर्षींनी नैसर्गिक आपत्तींची सांगितलेली कारणे

श्री. विनायक शानभाग

१ अ. चैतन्य असणारी स्थानेच काळाच्या ओघात टिकून रहातील ! : ‘तांत्रिक त्यांच्या इष्टदेवतेचे मंदिर बांधतात. काही काळ अशी मंदिरे प्रसिद्ध होतात; मात्र काळाच्या ओघात अशी मंदिरे टिकत नाहीत. ज्या मंदिरांमध्ये चैतन्य आहे, तीच स्थाने टिकून रहाणार आहेत.

१ आ. देवावर श्रद्धा नसलेल्यांसाठी रुग्णालये आणि यमलोक यांचे दार उघडले जाईल ! : जो मनुष्य भगवंताच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन देवाचे दर्शन घेत नाही, म्हणजे ज्याची देवावर श्रद्धा नाही, अशांसाठी रुग्णालये आणि यमलोक यांचे प्रवेशद्वार उघडले जाणार आहे.

१ इ. कोरोनानंतर या जगात अजून एक मोठी व्याधी येणार आहे. ही व्याधीही विदेशातून चालू होणार आहे.

केरळमध्ये पूर्वी आलेल्या महापुरातील बचावकार्याचे प्रातिनिधिक छायाचित्र

१ ई. वामाचारामुळे अशुद्ध झालेली भूमी निसर्गच शुद्ध करील ! : केरळ राज्यात गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाचा प्रकोप पुष्कळ वाढला आहे. ‘अवेळी पाऊस, दरडी कोसळणे, पूर येणे, अनेक प्रयत्न करूनही कोरोनासारख्या व्याधी न्यून न होणे’, असे अनेक त्रास तेथील प्रजा भोगत आहे. याचे कारण म्हणजे तिकडे वामाचार (वेदांस मान्य नसणारे आचार) मोठ्या प्रमाणात होत आहेत. वामाचार आणि गायीचे रक्त मोठ्या प्रमाणात सांडल्यामुळे तिकडची भूमी अशुद्ध झाली आहे. (केरळ राज्यात सर्वांत अधिक गोमांसाचे भक्षण होते. – संकलक) आता निसर्गच भूमीची शुद्धी करत आहे.

१ उ. मोठ्या प्रमाणात होणारे भूकंप आणि वादळे ! : येणाऱ्या काळात उंच उंच इमारती नृत्य करायला (भूकंपामुळे हलायला) लागतील. आतापर्यंत लोकांनी घर आणि मार्ग यांवर पूर अन् वादळ यांमुळे पाणी आल्याचे पाहिले आहे. आता लोकांच्या उंच इमारतीमध्ये पूर आणि वादळ यांचे पाणी येणार आहे.

१ ऊ. समुद्राच्या खाली असलेला जगाचा विनाश करणारा ज्वालामुखी जागृत होणे : समुद्राच्या खाली अनेक अग्नीपर्वत (ज्वालामुखी) आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे स्फोट होतील. समुद्राच्या आत अग्नी, तेल, रत्ने आणि वनस्पती आहेत. त्यातून आम्हाला औषधे मिळतात; पण त्याच समुद्राच्या आत ज्वालामुखी आहे, जो जगाचा विनाश करील.

१ ए. विनाशकारी जागतिक महायुद्ध होणार असणे : येणाऱ्या काळात अग्नीचा पाऊस येईल, म्हणजे जागतिक महायुद्ध होईल. असे दिवस येतील की, भूतलावरील लोक भगवंताला ‘वाचव, वाचव’, अशा हाका मारतील. (अतिशय भयावह स्थिती असणार आहे, असे महर्षींना सांगायचे आहे.’ – संकलक)

१ ऐ. मनुष्य अधर्माने वागू लागल्यावर देव त्याचा नाश करतो ! : भूमी म्हणजे ‘शक्ति’ आणि आकाश म्हणजे ‘शिव’ ! मनुष्य भूमीच्या, म्हणजे शक्तीच्या मांडीवर वास करत आहे आणि आकाशाच्या, म्हणजेच शिवाच्या छायेत रहात आहे; मात्र जेव्हा मनुष्य अधर्माने वागायला लागतो, तेव्हा भूमी आणि आकाश यांना मानवाचा नाश करायला काही क्षणही पुरेसे होतील.

१ ओ. येणाऱ्या काळात लोक किडा-मुंगीसारखे मरतील.

२. सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९४ (१५.१२.२०२१) मध्ये सप्तर्षींनी भूकंप, ज्वालामुखी, पूर आणि व्याधी यांविषयी सांगितलेली सूत्रे

अ. भूमीतून भयानक शब्द ऐकू येतील. (महाभयंकर भूकंप होतील. – संकलक)

आ. पृथ्वीवर अग्नीच्या नद्या वहातील. (मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी उसळतील आणि लाव्हारस अग्नीच्या नद्यांसारखा वाहील. – संकलक)

इ. येणाऱ्या काळात पूर असा असेल की, तो केवळ पूर नसून समुद्रच भूमीवर आल्यासारखे वाटेल.

ई. युद्धाच्या वेळी करण्यात येणाऱ्या अस्त्रांच्या वापरामुळे आकाशात विचित्र दृश्य दिसेल. एका बाजूने मिसाईल सुटत आहे आणि दुसऱ्या बाजूने विमान इकडून तिकडे जात आहे, असे दृश्य असेल.

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीतील रुग्णावर चालू असलेले उपचार

उ. आता ‘ॲमिक्रॉन’ नावाचा विषाणू आला आहे; पण त्यात शक्ती नाही. थोड्या दिवसांनी अजून एक रोग येणार आहे. त्या एकाच रोगात ५ प्रकारचे वेगवेगळे रोग एकत्रित असतील. या रोगामुळे जगात हाहाःकार माजेल.

३. सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९६ (३.२.२०२२) मध्ये पुढे साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्येक वाक्याची प्रचीती येणार असल्याचे सप्तर्षींनी सांगणे

अ. जगात महायुद्ध होणार आहे. हे युद्ध कधीही आरंभ होऊ शकते. जागतिक स्तरावर तशी परिस्थिती निर्माण होत आहे.

आ. अकस्मात् आकाशातून मोठ्या प्रमाणात विजा पडतील. अनेक लोक मरतील, अनेक प्राणी मरतील, तसेच मोठ्या प्रमाणात घरे उद्ध्वस्त होतील.

इ. समुद्राच्या खाली असलेल्या ज्वालामुखींचा स्फोट होईल.

ई. समुद्र कधीही त्याची मर्यादा ओलांडू शकतो. अनेक ठिकाणी समुद्र भूमीला गिळंकृत करील.

उ. येणाऱ्या ५ वर्षांत एक काळ असा येईल की, ‘आता नवीन युगाला आरंभ होणार आहे का ?’, असे वाटेल. पृथ्वीवर प्रलयासारखी स्थिती असेल.

ऊ. भगवंताने जन्माला घातलेला प्रत्येक जीव जन्मतः हिंदूच असतो. त्या जिवावर होणाऱ्या विरुद्ध संस्कारांमुळे तो जीव धर्मांतरित होतो. येणाऱ्या काळात धर्मांतर करणारे आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे देशही नष्ट होतील.

ए. पुष्कळ साधकांनी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे आपत्काळाची सिद्धता केली आहे. काही साधक स्थलांतरितही झाले आहेत. पुढे साधकांना गुरुदेवांच्या प्रत्येक वाक्याची प्रचीती येईल.

४. सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्रमांक १९७ (७.३.२०२२) मध्ये सप्तर्षींनी होणारे महायुद्ध आणि त्यामुळे उद्भवणारी वाईट स्थिती यांविषयी सांगितलेली सूत्रे

रशियाने केलेल्या आक्रमणात बेचिराख होत असलेला युक्रेन

४ अ. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्ध हे न्यायसंमत युद्ध नसणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महायुद्धाविषयी सांगितले आहे. आम्ही सप्तर्षींनीही नाडीपट्टीत अनेक वेळा याचा उल्लेख केला आहे. आता तसा काळ जवळ आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे ‘युक्रेनमधील अनेक लोकांना घरे सोडावी लागली, लाखो लोकांना अन्न मिळत नाही, पिण्याचे पाणी नाही’, असे दृश्य दिसत आहे. राजकारण्यांच्या अहंकारामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू झाले आहे. हे धर्मयुद्ध किंवा न्यायसंमत युद्ध नाही. हत्तीने-हत्तीशी युद्ध केले, तर ठीक आहे; पण हत्तीने मुंगीशी युद्ध केले, तर ते योग्य होईल का ?

४ आ. युद्ध टप्प्याटप्प्याने वाढत जाणार असून देवभक्तांना अधर्माविषयी चीड येईल, तेव्हा त्यांचा धर्मसंस्थापनेच्या कार्यात हातभार लागणार असणे : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. आता श्रीकृष्ण रथावर आरूढ होऊन निघाला आहे. लवकरच जगात महायुद्धाला आरंभ होणार आहे. जगात काही राष्ट्रांमध्ये युद्ध चालू झाले आहे, तर काही राष्ट्रांमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. युद्ध टप्प्याटप्प्याने पुढे वाढत जाईल. देवाच्या भक्तांना अधर्माविषयी चीड आल्यावर त्यांच्याकडून धर्मासाठीचे खरे कार्य, म्हणजे धर्मसंस्थापनेच्या कार्यात हातभार लागणार आहे.

४ इ. विदेशांतील भारतीय विदेश सोडून भारतात येतील, तेव्हा विदेशांत हाहाःकार माजणार असणे : भारतीय अनेक देशांमध्ये जाऊन वसले आहेत. युद्ध चालू झाल्यावर त्यांना भारताचे महत्त्व लक्षात येईल. ‘भारतामध्ये आपल्या गावात आपले एक घर असल्यास बरे होईल’, असे त्यांना वाटू लागेल. असे भारतीय विदेश सोडून भारतात आल्यानंतर विदेशांतही हाहाःकार माजेल; कारण त्या त्या देशात भारतीय महत्त्वाची कामे करत आहेत.

४ ई. आर्थिक स्थिती अत्यंत बिघडणे : पुढे अशी स्थिती येईल की, सरकारी नोकरांना पगार द्यायला सरकाराकडे पैसे नसतील. एवढेच नव्हे, तर निवृत्तीनंतर देण्यात येणारे निवृत्तीवेतनही सरकार देणार नाही. ‘प्रॉव्हिडंट फंडा’चे पैसेही मिळणार नाहीत. सरकारकडेच पैसे नसतील, तर ते लोकांना पैसे कसे देईल ?’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)