सावरकर म्हणजे शौर्य, धाडस आणि तत्त्वनिष्ठता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त फर्ग्यूसन महाविद्यालयातील (पुणे) त्यांच्या खोलीची हिंदु जनजागृती समितीकडून स्वच्छता

पुणे – महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या खोलीची माहिती करून घेतली पाहिजे. सावरकर म्हणजे शौर्य, सावरकर म्हणजे धाडस आणि तत्त्वनिष्ठता हे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. काही जणांकडून सावरकरांना केवळ विज्ञानवादी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र ते प्रखर हिंदुत्वनिष्ठ होते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २१ मे या दिवशी तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने ‘क्रांतीकारक स्मारक स्वच्छता’ मोहीमेच्या अंतर्गत येथील फर्ग्यूसन महाविद्यालयात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रहात्या खोलीची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट

या मोहिमेत शिरोळे घराण्याचे वंशज श्री. अभयराजे शिरोळे, फर्ग्यूसन महाविद्यालयातील ३० विद्यार्थी, १० कर्मचारी यांसह हिंदु जनजागृती समितीचे ९ कार्यकर्ते उपस्थित होते. खोली स्वच्छता करण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्या खोलीतून स्वातंत्र्य क्रांतीची बीजे रोवली गेली तेथून ‘राष्ट्र-धर्माचे कार्य करण्याची ऊर्जा आणि चैतन्य आम्हाला मिळो’, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या खोलीची स्वच्छता करतांना कार्यकर्ते
श्री. सुनील घनवट

१. श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, सावरकर यांनी मार्सेलिसमध्ये मारलेली उडी त्रिखंडात गाजली. ‘अभिनव भारत संघटने’ची स्थापना करून अनेक क्रांतीकारकांना त्यांनी दिशा दिली. ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी प्राणांचे बलीदान दिले त्यांचे मोठे योगदान आहेच; पण ज्यांनी देश स्वतंत्र होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांचेही योगदान आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते.

२. या वेळी इतिहास संशोधक श्री. देवाशिष कुलकर्णी म्हणाले, ‘‘सावरकरांचे मनोबल कारागृहातील खडतर जीवनातही कधीच खचले नाही. आजच्या पिढीने मनोबल कणखर करण्यासाठी सावरकरांकडून प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सावरकरांचे साहित्य वाचले पाहिजे.’’

३. ‘झुंज प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. मल्हार पांडे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या ठिकाणी असतांनाच स्वदेशी चळवळ, विदेशी कपड्यांची होळी आदी क्रांतीकारी चळवळी राबवल्या. विद्यार्थ्यांनी प्रतिदिन येथे येऊन माथा टेकवून स्फूर्ती घेतली पाहिजे.’’