(म्हणे) ‘भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत असून ठिणगी टाकल्यावर देश जळायला लागेल !’ – राहुल गांधी

केंब्रिज विश्‍वविद्यालयात आयोजित ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या चर्चासत्रात बोलतांना राहूल गांधी

लंडन (ब्रिटन) – भाजप देशात ध्रुवीकरणाचे रॉकेल शिंपडत आहे. तुम्हाला केवळ एक ठिणगी टाकायची आहे, मग देश स्वतःच जळायला लागेल, अशी फुकाची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केली. ते केंब्रिज विश्‍वविद्यालयात आयोजित ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या चर्चासत्रात बोलत होते. ‘चीनने लडाख आणि डोकलाम येथे युक्रेनसारखी परिस्थिती केली आहे; मात्र भाजप सरकार त्यावर कारवाई करत नाही. केंद्र सरकार या विषयावर बोलण्यास घाबरत आहे’, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. (राहुल गांधी यांचे पणजोबा नेहरू पंतप्रधान असतांना चीनने भारताची सहस्रो चौरस कि.मी. भूमी गिळंकृत केली आणि काँग्रेसने कधीही ती चीनकडून परत मिळवली नाही, याविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ? – संपादक)

राहुल गांधी एका प्रश्‍नाच्या उत्तरात म्हणाले की, भारतातील लोकशाहीची स्थिती सध्या चांगली नाही. (भारतातील लोकशाहीच्या दुःस्थितीला काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे राहुल गांधी का सांगत नाहीत ? – संपादक) भाजपवाल्यांनी घटनात्मक पदांवर नियंत्रण मिळवले आहे. सर्व शासकीय संस्थांमध्ये पाठीमागून लोकांना प्रवेश दिला जात आहे. आम्ही या लोकांशी लढत आहोत.