विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

कागल येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

कागल (जिल्हा कोल्हापूर), ५ मार्च (वार्ता.) – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण, तसेच तेथील समाध्या-मंदिरे यांची दुरवस्था याला वाचा फोडली. या संदर्भात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, कार्यकर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र, आंदोलन, निवेदन यांद्वारे कारवाईची मागणी केली. यानंतर कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकार्‍यांनी येथील मोजणी पूर्ण करणे, तसेच अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्याच्या सूचना केल्या. या संदर्भात अतिक्रमणधारकांना दिलेल्या नोटिसांचा कालावधी उलटूनही त्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे लक्षात येत आहे. तरी या संदर्भात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांच्या नावे असलेले निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना ४ मार्च या दिवशी दिले.

या वेळी भाजप तालुका सरचिटणीस श्री. एकनाथ पाटील, भारतीय किसान संघाचे श्री. दिलीप पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विजय आरेकर, धर्मप्रेमी सर्वश्री रामचंद्र पाटील, प्रदीप महाडिक, आप्पासाहेब पाटील, सुनील बोते, अनिल बोते, सामाजिक कार्यकर्ते श्री. धनराज घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अविनाश पवार आणि श्री. दीपक भोपळे उपस्थित होते. या निवेदनाची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पर्यावरणमंत्री यांना पाठवण्यात आली आहे.

१. नोटिसा देऊन आता २ मासांचा कालावधी उलटला तरी या संदर्भात पुरातत्व खाते आणि संबंधित अधिकारी हे पुढील कोणतीच कृती करत नाहीत, हे गंभीर आहे.

२. गेल्या २ मासांपासून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, दुर्गप्रेमी विशाळगडाची स्वच्छता करत आहेत. यात ३१ डिसेंबरच्या कालावधीत गडावर मद्य, गांजा, अफू, गुटखा यांसारखे पदार्थही आढळले.

तरी या प्रकरणी आम्ही मागण्या करतो की,

१. विशाळगडाच्या पायथ्याशी कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी करावी, तसेच गडावर रहाणार्‍या आणि येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाचे ओळखपत्र पडताळले जावे.

२. या संदर्भात १५ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील.