पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?

  • ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष वेलणकर यांची मागणी

  • योजनेवर आतापर्यंत १ सहस्र ६०० कोटी व्यय

पुणे – समान आणि पुरेसे पाणी मिळण्यासाठी पुणे महापालिकेने चालू केलेल्या ‘समान पाणीपुरवठा योजने’वर आतापर्यंत १ सहस्र ६०० कोटी रुपये व्यय झाले आहेत. त्यातून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास ९ ते १० महिने लागतील, असा दावा प्रशासनातील अधिकारी करत आहेत. या योजनेला लागलेला वेळ आणि त्यावर झालेला व्यय लक्षात घेता त्याची ‘श्वेतपत्रिका’ काढून पुणेकरांसमोर ठेवावी, अशी मागणी ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून माहिती देणे आवश्यक आहे ! – संपादक)

महापालिकेने वर्ष २०१८ मध्ये ‘समान पाणीपुरवठा योजना’ राबवण्यास आरंभ केला. नवीन जलवाहिन्या टाकणे, पाण्याच्या टाक्या उभारणे आणि नागरिकांच्या नळजोडण्यांना पाणी मीटर बसवण्याचे नियोजन होते. या प्रकल्पाचे काम नियोजनानुसार मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. प्रत्येक वेळी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. समान पाणीपुरवठ्यासाठी १४१ स्वतंत्र विभाग सिद्ध करण्यात आले. त्यातील ५० विभाग कार्यान्वित झाले आहेत. राहिलेल्या विभागांमध्ये जलवाहिन्या, जलकुंभ आणि मीटर प्रणाली उभारण्यात येत आहे. प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना रखडल्याने पुणेकरांना तिचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. शहरावर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.