जळगाव येथे अण्णा हजारे यांच्या ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासा’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

‘सुपर मार्केट आणि मॉल’मध्ये वाईन विक्रीचा निर्णय रहित करण्याची मागणी !

जळगाव – महाराष्ट्र शासनाने किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल येथे वाईन विकण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्र सरकारने तातडीने रहित करावा, अशी मागणी करणारे निवेदन समाजसेवक अण्णा हजारेप्रणित ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास जळगाव जिल्हा’ यांच्या वतीने येथील जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना ८ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले.

१. हे निवेदन जिल्हापुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी स्वीकारले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, या निर्णयामुळे युवा पिढी, तसेच सामान्य जनता व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढल्याविना रहाणार नाही. त्यामुळे हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. त्यामुळे राज्यशासनाने हा निर्णय रहित करावा अन्यथा ‘भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास जळगाव जिल्ह्या’च्या वतीने तालुका आणि जिल्हा स्तरावर आंदोलन छेडण्यात येईल.

समाजसेवक अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र –

(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

२. या निर्णयाच्या विरोधात समाजातील सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा निर्णय त्वरित रहित न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणास आणि आंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे.