राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २३.१.२०२२

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

उत्तरदायींची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आयुष्यभर कारागृहात ठेवा !

‘नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या माहितीतून वर्ष २०११-२०१२ पासून ते २०२०-२०२१ पर्यंतच्या १० वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडित खात्यात गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास राष्ट्रीयीकृत बँका अपयशी ठरल्या. कर्जदाराची विनाउपयोगी मालमत्ता जप्त करून विकल्यानंतरही वसुली अपूर्णच राहिली, अशीही माहिती उघड झाली आहे.’


संसदेतील ५० टक्क्यांहून अधिक नेते हे अशिक्षित, जातीयवादी, धनाढ्य किंवा गुंड प्रवृत्तीचे असतांना याला ‘व्यवस्था’ म्हणायचे कि ‘गुंडगिरी’ ?

‘सध्याच्या संसदेतील ५० टक्क्यांहून अधिक नेते हे अशिक्षित, जातीयवादी, धनाढ्य किंवा गुंड प्रवृत्तीचे आहेत.  अशांची जनहितकारी कायदे बनवण्याची क्षमता आहे का ? कायदे बनवणे, हे तर विद्वानांचे कार्य आहे. गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांकडून सुराज्य कधी निर्माण होईल का ?

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.


हे अकार्यक्षम प्रशासनामुळेच होत असल्याने अशा लोकशाहीऐवजी सात्त्विक शासनकर्ते हवेत !

‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (जमीन खरेदी- विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय बनले आहे. लोकांचे प्राण संकटात टाकून रुग्णालयांची भरभराट होऊ देण्यास आम्ही अनुमती देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले.’


स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकाही शासनकर्त्या राजकीय पक्षाने म. गांधी यांच्या हत्येनंतर ब्राह्मणांच्या झालेल्या हत्यांच्या संदर्भात काहीच केले नाही. हे लक्षात घेऊनच राजकीय पक्षांच्या ऐवजी केवळ हिंदुत्वनिष्ठ साधक शासनकर्तेच देशाला तारतील, हे लक्षात घ्या !

‘चित्पावन ब्राह्मण असलेले पंडित नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी म. गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवल्या. यात २० सहस्र ब्राह्मणांची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. २ ते ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या करण्यात आल्या. ही संख्या ८ सहस्रही असू शकते. महिला आणि मुले यांनाही लक्ष्य करण्यात आले. या दंगलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाऊ नारायण दामोदर सावरकर यांचीही हत्या करण्यात आली होती. एवढा मोठा नरसंहार होऊनही पोलिसांनी एकही गुन्हा नोंदवला नाही. काँग्रेसच्या दबावामुळे हे घडले, असा आरोप प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केला.’