मुंबईत हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांचा डिसेंबरमध्ये मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. या वेळी त्यांनी खासदार, आमदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच अधिवक्ता आणि समाजातील प्रतिष्ठित यांच्या भेटी घेतल्या. हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्या बैठकाही घेण्यात आल्या. या वेळी मिळालेला प्रतिसाद, तसेच मान्यवरांनी या वेळी व्यक्त केलेले विचार यांचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय अतिशय गंभीर असून यावर लोकसभेत आवाज उठवणे अतिशय महत्त्वाचे ! – आमदार दिवाकर रावते, विधान परिषद, शिवसेना

आमदार दिवाकर रावते (मध्यभागी) यांना पंचांग भेट देतांना सुनील घनवट आणि बळवंत पाठक

‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय अतिशय गंभीर असून यावर लोकसभेत आवाज उठवणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार दिवाकर रावते यांनी भेटीमध्ये व्यक्त केले.

या भेटीत विशाळगड रक्षा अभियान, पारोळा किल्ला यांविषयी समितीने केलेल्या कार्याची माहिती सांगितली गेली. ‘बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मृतीचा किल्ला सुकाणू समितीत का नाही ?’ असा प्रश्न आमदारांनी या वेळी उपस्थित केला. अध्यात्म, धर्म, राष्ट्र आणि आयुर्वेद आदी ग्रंथांची माहिती या वेळी सांगण्यात आली.


श्रद्धास्थानांची नावे असलेल्या ‘बिअर बार’ला विरोध करणार ! – आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे, विधान परिषद, शिवसेना

आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे यांना सनातन पंचांग भेट देतांना सुनील घनवट आणि उजवीकडून प्रसाद मानकर आणि बळवंत पाठक

‘श्रद्धास्थानांची नावे असलेल्या बिअर बारला विरोध करणारा ठराव मी मांडला आहे. या वेळी अधिवेशनात तो ठराव चर्चेसाठी येऊ शकतो’, अशी माहिती आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे यांनी भेटीत दिली. या वेळी ईशनिंदाविषयक कायद्याची आवश्यकता, लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र यासंदर्भात चर्चा झाली.


‘हलाल प्रमाणपत्रा’चा विषय ऐकून त्याचे गांभीर्य लक्षात आले ! – दिनेश पाटील, संपादक, दैनिक लोकदृष्टी, नवी मुंबई

दिनेश पाटील यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ हा विषय सविस्तर सांगितल्यावर ‘हा विषय पुष्कळ गंभीर आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्र, तसेच देवता, धर्म, आचारधर्म, साधना आदी ग्रंथांविषयी त्यांच्या दैनिकात लेख प्रसिद्ध करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.


‘हलाल प्रमाणपत्र’ एक समांतर राज्यव्यवस्था ! – कीर्ती राणा, उद्योजक, नवी मुंबई

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून आर्थिक नाड्या स्वतःकडे घेऊन एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा धर्मांधांचा डाव आहे, असे उद्गार किर्ती राणा यांनी या वेळी काढले. ‘उद्योगपतींमध्ये जागृती करून त्यांचे संघटन करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी साहाय्य करीन’, असे राणा या वेळी म्हणाले. राष्ट्र आणि धर्म विषयक विविध ग्रंथांच्या विषयी या वेळी चर्चा करण्यात आली.


लोकप्रतिनिधींकडून विविध विषयांवर सहकार्य करण्याचे आश्वासन !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर, शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस आदी लोकप्रतिनिधींसमवेत ‘हलाल प्रमाणपत्र’, ‘विशालगड रक्षण मोहीम’ या विषयांसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच आयुर्वेद, आचारधर्म, संस्कार, राष्ट्रविषयक विचार आदी विषयांवरील ग्रंथांविषयी या वेळी चर्चा झाली. या वेळी चर्चा झालेल्या सर्व विषयांविषयी सहकार्य करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले.


धर्मकार्य करणे महत्त्वाचे आहे ! – एस्.डी. मराठे, सरोज स्वीट्स, चेंबूर

‘धर्मकार्य करणे महत्त्वाचे असून परमेश्वरच सर्व काही देत असतो. तोच कर्ता आणि कराविता आहे’, असे मराठे म्हणाले. अध्यात्माच्या संदर्भातील स्वतःचे अनुभव मराठे यांनी भेटीत सांगितले. उद्योग ‘साधना’ म्हणून कसा होतो आणि देवाशी कसे सतत बोलणे होते याविषयी मराठे यांनी या वेळी सांगितले. यावर घनवट यांनी ‘यालाच आध्यात्मिक परिभाषेत ‘ईश्वराशी अनुसंधान’ म्हणतात’, असे सांगून प्रयत्नांविषयी सविस्तर जाणून घेतले. या वेळी हलाल प्रमाणपत्र, गड-किल्ल्यांवर होणारे आघात यांविषयी चर्चा झाली. अध्यात्म आणि धर्म यांविषयीच्या विविध ग्रंथांच्या प्रसारासाठी साहाय्य करण्याचे आश्वासन मराठे यांनी या वेळी दिले.


हिंदुत्व जगणे आवश्यक आहे ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महापालिका

आज हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीत आणून त्याप्रमाणे जगणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने प्रत्येकानेच प्रयत्न वाढवायला हवेत, असे मत महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले. या वेळी ‘लव्ह जिहाद’मधून कशा प्रकारे हिंदु मुलींना वाचवले, याविषयीचे प्रसंग महापौरांनी सांगितले.

हलाल प्रमाणपत्राच्या संदर्भातील माहिती ऐकून ‘हे एक ‘स्लो पॉयझनिंग’ (हळू पसरणारे विष) आहे’, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्र आणि धर्म विषयक विविध ग्रंथांची माहिती ऐकल्यावर त्याच्या प्रसाराच्या संदर्भात साहाय्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक आहे ! – आमदार योगेश सागर, चारकोप, भाजप

‘‘हलाल प्रमाणपत्राविषयी सामाजिक माध्यमातून जागृती होणे आवश्यक आहे. सामाजिक माध्यमाच्या दृष्टीने साहाय्य करू. हिंदु समाज चेतनाहीन झाला आहे. हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक आहे’’, असे उद्गार आमदार सागर यांनी या वेळी काढले.


हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याचा कुर्ला येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

अनधिकृत भोंगे कायदेशीर मार्गाने उतरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून याचिका प्रविष्ट केलेल्या कुर्ल्यातील हिंदुत्वनिष्ठांसमवेत बैठक झाली. या बैठकीसाठी साळवी आणि अभिषेक कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. या बैठकीत लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचसमवेत ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधना करण्याचे महत्त्व काय आहे ?’ याविषयीही सविस्तर सांगण्यात आले. उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहयोग देण्याची इच्छा या वेळी प्रदर्शित केली.


हिंदूंवरील होणार्‍या आघातांविषयी समाजामध्ये जागृती करण्याचा मालाड येथे झालेल्या उद्योगपतींच्या बैठकीत धर्मप्रेमींचा निर्धार !

उद्योजक आनंद बागवे यांच्या पुढाकाराने मालाड येथील त्यांच्या निवासस्थानी काही उद्योजक आणि त्यांच्या वसाहतीतील धर्मप्रेमी यांची बैठक झाली. या बैठकीत लव्ह जिहाद, लँड जिहाद, मनी जिहाद, हलाल प्रमाणपत्र या संदर्भातील आघातांची माहिती सुनील घनवट यांनी उपस्थितांना दिली. या वेळी उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी शंकानिरसनही करून घेतले. हिंदु धर्मावरील होणार्‍या आघातांच्या विरोधात कृती करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त केला. या बैठकीत महिला धर्मप्रेमीही उपस्थित होत्या.

उद्योजक आनंद बागवे हे एम्.आय.डी.सी., लोटे, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. लोटे येथे त्यांचा रसायनांचा कारखाना (केमिकल फॅक्टरी) आहे. लोटे येथील हलाल प्रमाणापत्राच्या संदर्भातील हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांच्या कार्यक्रमामुळे ते पुष्कळ प्रभावित झाले होते आणि त्यामुळे त्यांनी वरील कार्यक्रम आयोजित केला.