श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमधील नमाजपठणावर बंदी घाला !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीच्या अध्यक्षांकडून मथुरा न्यायालयात याचिका

मुसलमान आक्रमकांनी कह्यात घेतलेली धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी हिंदूंना न्यायालयीन लढा का द्यावा लागतो ? अशी सर्वच मंदिरे ‘मुक्त’ करण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही ?

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये करण्यात येणार्‍या नमाजपठणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट करून त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मशिदीच्या बाजूला असणार्‍या रस्त्यावरही नमाजपठण करण्यास बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. (रस्त्यावरील नमाजपठणावर बंदी घालण्यासाठी न्यायालयात जाऊन मागणी का करावी लागते ? पोलीस आणि प्रशासन यांना ते दिसत नाही का ? ते आंधळे आहेत का ? राज्यात भाजपचे सरकार असतांना असे होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक) श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष आणि अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. यावर ५ जानेवारी २०२२ या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

१. या याचिकेत म्हटले आहे की, कुराणानुसारही वादग्रस्त असलेल्या भूमीवर नमाजपठण करण्यास बंदी आहे. या मशिदीमध्ये ५ वेळा नमाजपठण करण्याचा प्रारंभ काही काळापासूनच चालू झाला आहे आणि तो अवैध आहे. यापूर्वी या मशिदीमध्ये नमाजपठण होत नव्हते. आता रस्त्यावरही नमाजपठण होऊ लागले आहे. हा सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा कट आहे.

२. या याचिकेमध्ये वर्ष १९२० च्या न्यायालयाच्या एका खटल्याचा हवाला देण्यात आला आहे. यात न्यायालयाने म्हटले होते, ‘ईदगाह मशिदीची जागा हिंदूंची आहे.’ यासह या याचिकेत म्हटले आहे की, या ईदगाह मशिदीच्या भिंतींवर अजूनही ॐ, शेषनाग, स्वस्तिक आदी हिंदूंची धार्मिक चिन्हे आहेत.

३. या प्रकरणी जून मासामध्ये श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीने एक प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार या मशिदीला दुसरीकडे मोठी जागा देण्याचे म्हटले होते. तसेच सध्याची मशीद मुसलमानांनीच पाडून ती जागा हिंदूंना देण्याचे यात म्हटले होते.