प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी ४५ मीटर खोल सरस्वती नदी असल्याचे ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ सर्वेक्षणातून स्पष्ट !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी ४५ मीटर खोल सरस्वती नदी अस्तित्वात आहे, असा शोध वैज्ञानिकांनी ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ सर्वेक्षणातून लावला आहे. या सर्वेक्षणाचा अभ्यास ‘काऊंसिल ऑफ सायंटिफीक अँड इंडिस्ट्रियल रिसर्च’ आणि ‘नॅशनल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ यांच्या वैज्ञानिकांच्या ‘अ‍ॅडवांस्ड अर्थ अँड स्पेस सायन्स’ या ‘जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. सरस्वती नदी १२ सहस्र वर्षांपूर्वी पृथ्वीवरून लुप्त झाल्याचे सांगण्यात येते. हिंदूंच्या धर्मग्रंथांनुसार गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचे उगम स्थान हिमालयात आहे.

१. सध्या भारतातील नद्यांतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अशा वेळी ‘हिमालयांतूनच नाही, तर भूमीच्या खालूनही पाणी मिळत असते का ?’ याविषयी हे वैज्ञानिक संशोधन करत होते. यासाठी ‘थ्रीडी मॅपिंग’ करण्यासाठी ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२. या सर्वेक्षणतून लक्षात आले की, गंगा आणि यमुना नदी यांच्या तळाला एक अतीप्राचीन नदी अस्तित्वात आहे. या नदीच्या प्रवाहाचे स्रोत गंगा आणि यमुना या नद्यांशी जोडलेले आहेत. या प्राचीन नदीची लांबी ४५ किलोमीटर, रूंदी ४ किलोमीटर, तर खोली १५ मीटर आहे. जेव्हा ही नदी पूर्ण भरलेली असते, तेव्हा भूमीवरील १ सहस्र ३०० ते २ सहस्र चौरस किलोमीटर भूभागाला पाणी पुरवू शकते. ही नदी गंगा आणि यमुना या नद्यांच्या जलस्तराला संतुलित करण्याचेही काम करते.

३. ‘नॅशनल जियोफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या संचालकांनी सांगितले की, सरस्वती नदी भूमीच्या खाली ४५ मीटरवर असून ती १० सहस्र ते १२ सहस्र वर्षे जुनी आहे. तिच्याविषयीच्या सर्वेक्षणाचे काम अजून चालू आहे. आतापर्यंत ‘ही नदी कानपूरच्या दिशेने वहात आहे’, असे लक्षात आले आहे.

४. प्राचीन नद्यांच्या शोधासाठी केंद्र सरकारने ७ सदस्यांच्या आयोग नेमला होता. त्याने वर्ष २०१६ अहवाल सादर केला होता. त्यात म्हटले होते की, भूतलामध्ये प्राचीन सरस्वती नदी वहात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वर्ष २०१८ मध्ये केंद्र सरकारने राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमध्ये सरस्वती नदीचा शोध घेतला होता. हिमालयातून उगम पावणारी सरस्वती नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते, असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.