साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन !

जावेद अख्तर हिंदुविरोधी आहेत, त्यांना साहित्य संमेलनात बोलावू नका ! – ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांची भूमिका

पुणे – जावेद अख्तर हे नेहमीच हिंदु धर्माच्या विरोधात बोलतात आणि लिहितात. अशा व्यक्तीला बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका कोणता संदेश देऊ पहात आहेत ? जयंत नारळीकर यांच्यासारखी व्यक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असतांना वीर सावरकर यांच्या भूमीत अख्तर यांच्यासारख्या विकृतांना का बोलावण्यात येत आहे ?, असा रोखठोक प्रश्‍न ब्राह्मण महासंघाने विचारला आहे.

नाशिक येथे ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून गीतकार जावेद अख्तर उपस्थित रहाणार आहेत; मात्र ब्राह्मण महासंघाने जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘‘जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी नाट्यसृष्टीत काय योगदान आहे ? याचे उत्तर संमेलनाच्या आयोजकांनी द्यावे. फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. त्यामुळे अशा हिंदुविरोधी लोकांना अशा महत्त्वाच्या पदांचा सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’