हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रजागृतीपर घणाघाती विचार !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज १७ नोव्हेंबरला असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने…

आज शिवसेनाप्रमुख आपल्यामध्ये स्थूलदेहाने नसले, तरी त्यांचे विचार प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचार कृतीत आणणे, हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. ‘सनातन प्रभात’ परिवाराच्या वतीने हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांना शब्दसुमनांजली अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

‘हिंदु’ म्हणून एकजूट झाल्याविना आपण इस्लामशी टक्कर देऊ शकत नाही !

‘आज हिंदुस्थानची अशी परिस्थिती आहे की, केवळ मराठी, केवळ पंजाबी, बंगाली, गुजराती करून भागणार नाही; कारण इस्लाम फार जोरात आहे, हे आझाद मैदानावर तुम्हाला दिसले. असे असतांना आपण मराठी म्हणून इस्लामशी एकएकटे लढू शकतो का ? बंगाली किंवा पंजाबी म्हणून एकाकी लढू शकतो का ? तो लाल-बाल-पालचा काळ गेला निघून; मग असे असतांना एकच शब्द आहे तो हिंदुत्व ! हिंदू म्हणून एकजूट झाल्याविना आपण इस्लामशी टक्कर देऊ शकत नाही.’

धर्मांध मुसलमानांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी निधर्मीपणाचा सूर आळवू नये !

‘मुंबईत दंगलखोर मुसलमानांनी प्रसारमाध्यमांची वाहने जाळली. काहींना चोप बसला. हे सर्व शिवसेनेच्या मोर्च्यात झाले असते, तर हीच प्रसारमाध्यमे आमचे लचके तोडायला एक झाली असती. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आक्रमण म्हणून प्रसारमाध्यमवाले हज हाऊसच्या आवारात उपोषणास बसणार आहेत कि भेंडीबाजारात साखळी धरणे धरून न्याय मागणार आहेत ? धर्मांधांच्या संदर्भात निदान यापुढे तरी ‘निधर्मी’पणाचा फालतू सूर आळवू नये.’

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास होणारा विरोध डावलून त्यासाठी शिवसैनिकांना सिद्ध करणारे शिवसेनाप्रमुख !

‘ज्या कुणी पुरातत्व विभागातील बाबूरावांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यास मनाई केली, त्या पुरातत्व विभागास रायगडाच्या पायथ्याशी पुरून शिवराज्याभिषेकदिन सोहळा आम्ही साजरा करू. शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यावर बंदी घालणारी ही कोणती मोगलांची अवलाद तेथे बसली आहे ? या विभागास प्रतापगडाखाली पुरलेल्या अफझलखानाच्या कोथळ्याची जेवढी काळजी आहे, तेवढी रायगडसारख्या किल्ल्याची नाही. शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर नाही साजरा करायचा, तर काय देहलीच्या जामा मशिदीत साजरा करायचा ? शिवद्रोहींना टकमक टोकावरून ढकलल्याविना महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. रायगडावर शिवराज्याभिषेकदिन साजरा करून शिवरायांना मानाचा मुजरा करणार म्हणजे करणार ! कोण ‘मायका लाल’ आडवा येतो तेच पाहू !’

संकलक – श्री. यज्ञेश सावंत, पनवेल

अन्य विचार

  • ‘आज जे संपादक बसलेत ना, ते विकाऊ आहेत आणि टाकाऊ आहेत. हे राजकीय पक्षांचे चमचे आहेत. त्यांच्या लेखणीतून ते सरळ सरळ जाणवत आहे !’
  • ‘म्यानात तलवार नसतांना वीरत्व नको !’
  • ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबीसुद्धा स्वकियांशी लढणे होतेच. महाराजांना दोनशे लढाया मराठ्यांच्या विरोधात लढाव्या लागल्या !’

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ‘क्रिकेट’ या खेळाविषयीचे परखड मत

  • ‘भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा क्रिकेटचे सामने आयोजित करणार्‍या देशद्रोही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला चाबकाने फोडा !’
  • ‘क्रिकेट हा आता ‘जेन्टलमन्स’चा खेळ नव्हे, तर निर्लज्जांचा खेळ झाला आहे !’

संकलक – श्री. यज्ञेश सावंत, पनवेल