महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प यांच्या पुढाकाराने विविध मंदिरांचे पुजारी, गुरव यांना अन्नधान्य साहित्याचे वाटप

मंदिरांचे पुजारी, गुरव यांना अन्नधान्य साहित्याचे वाटप करतांना श्री. नितीन शिंदे (डावीकडे), डॉ. भालचंद्र साठ्ये, तसेच अन्य मान्यवर

सांगली, ४ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक मास मंदिरे बंद आहेत. त्यामुळे विविध मंदिरांचे पुजारी, गुरव, तसेच त्यांवर अवलंबून असणारे यांच्यावर अडचणीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने ‘महाएन्जीओ’, रुग्ण सेवा प्रकल्प मिरज, श्री. शेखर मुंदडा, श्री. चंद्रकांत राठी, स्थानिक संस्था यांच्या सहकार्याने या सर्वांना अन्नधान्य साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, रुग्ण सेवा प्रकल्पाचे डॉ. भालचंद्र साठये, श्री. श्रीकांत शिंदे, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख ह.भ.प. अजय कुमार वाले, ज्येष्ठ पत्रकार श्री. यशवंत कुंभार, सर्वश्री अविनाश मोहिते, तानाजी पाटील, अजय कांबळे, तसेच अन्य उपस्थित होते.

मंदिरे आणि त्यांवर अवलंबून असणारे यांना सरकारकडून कसलेही साहाय्य नाही ! – नितीन शिंदे, माजी आमदार

या प्रसंगी माजी आमदार म्हणाले, ‘‘गेल्या अनेक मासांपासून मंदिरे बंद असून मंदिरे आणि त्यांवर अवलंबून असणारे यांना सरकारकडून कसलेही साहाय्य करण्यात आलेले नाही. अन्य सर्व घटकांना साहाय्य करण्यात येते; मात्र मंदिरांनाच का साहाय्य करण्यात येत नाही ? सरकार मंदिरे खुली करण्याविषयी कधी निर्णय घेणार आहे ? दुसर्‍या आणि संभाव्य तिसर्‍या लाटेचे कारण पुढे करून सरकार कायमच मंदिर उघडण्याचा निर्णय टाळत आहे.’’