नेहरू कुटुंबामुळे देशाची अर्थव्यवस्था बिघडली ! – मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री विश्‍वास सारंग यांचा आरोप

डावीकडून भाजपचे मंत्री विश्‍वास सारंग आणि पंडित नेहरू

भोपाळ (मध्यप्रदेश) – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कुणाला द्यायचे असेल, तर ते नेहरू कुटुंबाला द्यायला हवे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसांत उभारला जात नाही. नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण देतांना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. उलट भाजपच्या कार्यकाळात महागाई न्यून झाली असून लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असा दावा मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्‍वास सारंग यांनी केला आहे. ते भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सारंग पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असूनही नेहरूंनी  त्याकडेच दुर्लक्ष केले. ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून नेहरूंंनी या क्षेत्राची चिंताच केली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर आणि टिकणारी होती. नेहरूंनी त्यांची पाश्‍चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली. सध्याच्या स्थितीसाठी नेहरूंची चुकीची धोरणे उत्तरदायी आहेत. उद्योग वाढवायला हवे होते; पण त्यांचा मूळ आधार हा शेती असणे आवश्यक होते.