कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करू नये ?

‘महिलांना पुरुष पुजार्‍यांच्या बरोबरीने गाभार्‍यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे’, अशी मागणी करत ९ वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात एका पक्षाच्या आमदाराने महिलांसह प्रवेश केला होता. त्यानंतर १ वर्ष ४ मासांनी या मागणीसाठी त्याच पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात घुसल्या. दोन्ही घटनांच्या वेळी श्री महालक्ष्मी मंदिरातील पुरोहित वर्गाने गाभार्‍यात महिलांना प्रवेश देण्यास विरोध केला होता. कुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करावा, याविषयी अध्यात्मशास्त्र काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘देवी असो कि देवता त्यांच्या कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात महिलांनी मासिक पाळीच्या वेळी जाऊ नये; कारण त्या वेळी महिलांमधील रजोगुण अधिक प्रमाणात वाढलेला असतो. परिणामी त्यांना गाभार्‍यातील सात्त्विकतेमुळे सूक्ष्मातून त्रास होण्याची शक्यता असते.

२. गाभार्‍यातील प्रवेशाचे पारंपरिक नियम आहेत. तेथील सोवळे कडक आहे. त्यामुळे स्त्रियांनी कडक सोवळे पाळले, तरच त्या जाऊ शकतात. सोवळे न पाळणार्‍या स्त्रियांनी गाभार्‍यात प्रवेश करू नये. पुरुषांनीही अंघोळ करून सोवळ्याविना गाभार्‍यात जाऊ नये. गाभार्‍यातील प्रवेशासंबंधीचे अध्यात्मशास्त्रानुसारचे पारंपरिक नियम पाळल्याने तेथील सात्त्विकता आणि पावित्र्य टिकून रहाते. हे नियम न पाळल्यास तेथील सात्त्विकता आणि पावित्र्य यांची हानी होते.

३. प्रत्येक पिठाचे ठरलेले नियम पाळणे आवश्यक असते; कारण त्यामागे विशिष्ट आध्यात्मिक हेतू असतात.

४. सध्या व्यवहारातही आपण कुणाकडे किंवा एखाद्या कार्यालयात गेलो, तर तेथील नियम पाळतो. तसेच देवळातील नियमही पाळणे आवश्यक आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.