जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या घराबाहेरील स्फोटामागे भारत असल्याचा पाकचा आरोप !

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! शिरजोर झालेल्या आतंकवाद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाककडूनच स्फोट घडवून धमकावण्यात येत असतांना त्याचे खापर भारतावर फोडण्याचा पाकचा प्रयत्न हास्यास्पदच आहे, हे जगाला ठाऊक आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार  हाफिज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. ‘या आक्रमणामागील संपूर्ण नियोजन आणि वित्तपुरवठा भारताने केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्गाने या वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करावी’, अशी मागणी इम्रान खान यांनी ट्वीट करून केली आहे. दुसरीकडे  ‘या आक्रमणाचा सूत्रधार भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चा एजंट आहे’, असा दावा पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी केला आहे. ‘२३ जून या दिवशी झालेल्या या आक्रमणासमवेतच अनेक सायबर आक्रमणेही करण्यात आली होती. अन्वेषणात अडथळा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले’, असाही दावा त्यांनी केला. हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण घायाळ झाले होते.